रत्नागिरी/ प्रतिनिधी
जिह्यात सलग दुसऱया दिवशी तीनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागील 24 तासांमध्ये जिह्यात नव्याने तब्बल 324 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिह्यात एकूण 7 कोरोना मृत्यूंचीही नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी बरे झालेल्या 66 जणांना घरी सोडण्यात आले.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जिह्यात झालेल्या 975 चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचणीमध्ये 260 तर ऍन्टीजेन चाचणीत 64 असे एकूण 324 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे पॉझिटिव्ह रेटही 26 टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये रत्नागिरीतील 65, दापोली 82, खेड 35, गुहागर 51, चिपळूण 57, संगमेश्वर 12, मंडणगड 10, राजापूर 9 व लांजा तालुक्यात 3 नव्या रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 621 पर्यंत पोहोचली आहे.
बुधवारी जिह्यातील एकूण 7 कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 13 एप्रिल रोजी दापोलीतील 65 वर्षीय पुरुष, रत्नागिरीतील 75 वर्षीय महिला व 64 वर्षीय पुरुष, लांजातील 78 वर्षीय पुरुष, संगमेश्वरातील 86 वर्षीय पुरुषाच्या मृत्यूचा समावेश आहे. 14 एप्रिल रोजी रत्नागिरीतील 76 वर्षीय पुरुष व चिपळूणमधील 38 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे जिह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या 415 व मृत्यूचे प्रमाण 3.04 झाले आहे.
बुधवारी जिह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 66 जणांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 11 हजार 299 झाली आहे. हे प्रमाण 82.95 पर्यंत घसरले आहे.
कोरोना रुग्णांची व कोरोनामुळे मृतांची जिह्यातील गेल्या काही दिवसातील आकडेवारी अनेकांना धडकी भरवणारी मानली जात आहे. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत गेल्यास आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. बुधवार रात्रीपासून लॉकडाऊन पाळला जाणार आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज या आकडेवारीमुळे अधोरेखित होत आहे. प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी यामुळे वाढली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच थैमान
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱयांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तब्बल 38 कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली आह़े यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही कोरोनाने थैमान घातल्याचे दिसत आहे. बहुतांश कर्मचाऱयांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याचे व अनेकांचे दोनही डोस झाल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर ही संख्या चिंताजनक मानली जात आहे.