दापोलीतील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ दापोली
शहरातील काळकाई कोंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर चार दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेले पाचही कावळे ‘बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे राज्यासह दापोलीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
शहरातील काळकाई कोंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर नगरपंचायतीच्या कर्मचाऱयांना चार दिवसांपूर्वी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी ही बाब मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय उपायुक्त मुकुंद लोंढे यांच्यासोबत घटनास्थळी खातरजमा केली. डॉ. लोंढे यांनी पंचनामा करून पाचही कावळे ताब्यात घेतले.
देशात सध्या ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पाचही मृत कावळे पुणे येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. या कावळ्यांचा तपासणी अहवाल सोमवारी दापोलीत प्राप्त झाला. यामध्ये पाचही कावळे बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉ. लोंढे यांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये: डॉ. लोंढे
याबाबत डॉ. मुकुंद लोंढे म्हणाले की, बर्ड फ्ल्यू हा आजार फक्त पक्ष्यांमध्ये आढळून येतो. पक्ष्यांपासून तो माणसाला झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र उघडय़ा वातावरणात पक्षी मरून पडला असेल तर त्याला हातांनी स्पर्श करू नये. ही बाब पशुवैद्यकीय दवाखाना व नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून द्यावी. वैद्यकीय अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
तूर्तास चिकन विक्रीवर बंदी नाही: मुख्याधिकारी रोडगे
दापोली शहरातील कावळ्यांना बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले असले तरीही येथील कोंबडय़ांना याची लागण झालेली नसल्याने सध्या शहरातील चिकन व अंडीविक्रीवर बंदी नसल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अधिकारी महादेव रोडगे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हय़ात यंत्रणा अलर्ट ..!
रत्नागिरी जिह्यात दापोलीतील मृत कावळय़ांचा तपासणी अहवाल बर्ड-फ्ल्यू पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडालेली आहे. पशुसंवर्धन सचिव अनुपकुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना दक्षता घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. यासाठी जिह्यात 9 विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
जिल्हाभरात दररोज हजारो कोंबडय़ांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोना काळाते पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झालेले असतानाच बर्ड फ्ल्यूचे नवे संकट ठेपले आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांसह चिकन विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. जिह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कोंबडय़ा किंवा पशू-पक्ष्यांवर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास विशेष पथकाद्वारे उपचार यंत्रणा राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक पथक नेमण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. पुजारी यांनी केले आहे.