विविध रुग्णालयात 13 हजाराहून अधिक रूग्णांवर उपचार
अरुण आठल्ये/ रत्नागिरी
वन समृद्धीने नटलेल्या या जिह्यात सर्पदंशाचे प्रकार वाढत आहेत. मागील 9 वर्षात 13 हजारांहून अधिक सर्पदंश रुग्णांवर शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यात 22 व्यक्तींना जीव गमवावा लागला. ही आकडेवारी बोलकी असून वन्यप्राणी, भटके कुत्र्यांपाठोपाठ सरपटणारे प्राणी व मानव असा संघर्ष उभा ठाकला आहे.
पावसाळ्यात साप व विंचू बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते चावण्याचे प्रमाण मोठे आहे. जिह्यात मागील 9 वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयातील माहितीनुसार, 2011 ते 2016 या पाच वर्षात 11 हजार 622 व्यक्तींना सर्पदंशामुळे दाखल करण्यात आले. त्यात 20 व्यक्तींना जीव गमवावा लागला. या आकडेवारीत जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर 2016 ते 2020 मध्ये मागील 4 वर्षात जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये 1 हजार 397 व्यक्तींना सर्पदंशामुळे दाखल करण्यात आले. 2017-18 मध्ये व 2019-20 मध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता सर्पदंश झालेल्या रुग्णाना तत्काळ उपचार मिळत असल्याने त्यांच्यावर ओढवणारी आफत दूर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत सापाच्या अनेक प्रजातींना प्रजनन काळ असतो. तसेच पाऊस सक्रिय झाल्याने बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. अशावेळी सापाच्या संपर्कात आल्यावर सर्पदंशाचे प्रकार हमखास घडत असतात. दंश केलेला साप विषारी होता कि बिनविषारी, हे माहित नसल्याने भीतीमुळे अनेकदा मृत्यू होत असतात. बिनविषारी सापाने दंश केल्यावर अनेकदा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. काही घटनात विषारी साप चावल्यावर उपाययोजना करण्यास विलंब झाल्यामुळेही मृत्यू होतात. शेतकऱयांचा मित्र असलेल्या हा प्राणी पर्यावरणाच्या संतुलनातही महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे साप दिसल्यानंतर त्याला मारण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्रांना फोन करा आणि सापाच्या संवर्धन व संरक्षणासाठी मदत करा, असे आवाहन वन्यजीवप्रेमींनी केले आहे.
सर्पदंश टाळण्यासाठी…..
-घराच्या किंवा कुंपणाच्या भिंती याना पडलेली बीळं बुजवावीत. त्यातील उंदराना खाण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.
-स्वयंपाक खोलीत व इतर अडगळीच्या ठिकाणी सामान काढताना नीट पहावे.
-ओसाड विहिरीत पोहू नये.
-खिडक्या-दरवाजे यांना लागून झाडाच्या फांद्या येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
-गवतातून चालताना पायात बूट असावेत.
-जमिनीवर झोपू नका. साप निशाचर असल्याने त्याचा वावर रात्री जास्त असतो.
-अंधारातून जाताना नेहमी बॅटरी सोबत ठेवा.
-साप दिसल्यास लगेच सर्पमित्राला फोन करा व तो येईपर्यंत सापावर लक्ष ठेवा.
चार विषारी सापांपासून सावध रहा!
नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अशा सापांपासून सावध रहावे, असे आवाहन सर्पमित्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.
सर्पदंश झाल्यास काय कराल?
-सर्पदंश झाल्यास घाबरुन जाऊ नये. कारण रक्ताभिसरण संस्थेत विष वेगाने पसरु शकते.
-सर्पदंश झालेल्या ठिकाणी जखम पाणी व साबणाने स्वच्छ धुवावी.
-जेथे सर्पदंश झाला आहे तेथे ब्लेडने उभा काप मारावा.
-सर्पदंश झालेल्या जागेपासून हृदयाकडे 10 सें.मी. इतक्या अंतरावर घट्ट पट्टी बांधावी, पण ती बांधत असताना एक बोट सरकवून पट्टी बांधणे.
-सर्पदंश झाल्यास त्वरित जवळचे शासकीय रुग्णालय गाठावे.