सरकारपातळीवर लवकरच निर्णय : भाजप गाभा समिती बैठकीत शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / पणजी
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तर पालिकांच्या निवडणुका या पणजी मनपाबरोबरच घेण्याबाबतचा निर्णय सरकार पातळीवर लवकरच होईल. भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत या विषयावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
प्रदेश भाजपची गाभा समितीची बैठक सुमारे 3 तासांपेक्षा जास्त वेळ चालली. सध्या काही शक्ती सरकारची बदनामी करण्यासाठी वावरत आहे त्याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळातील काही सदस्य हे सरकारच्या धोरणाविरोधात निवेदने करतात याची गंभीर दखल घेण्यात आली. आगामी वर्ष हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे कोळसा प्रकरण असो वा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण असो हे सर्व थांबविण्यात यावे या करिता आता भाजपचे नेते केंद्र सरकारला विनंती करणार आहे.
बैठकीत विविध विषयांवर गंभीरपणे चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे तसेच पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका व पालिका निवडणुका या स्वतंत्रपणे घेण्याबाबत बैठकीत चर्चा झालेली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली होती केवळ मतदान शिल्लक होते. आता एक अधिसूचना जारी करुन केवळ 4 दिवस प्रचारासाठी देऊन डिसेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात या निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर पालिका निवडणुका या पणजी मनपाबरोबर एकत्रित घेण्याचा विचार देखील भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत व्यक्त झाला.
आयआयटी सत्तरीतून हलविणार
उपलब्ध माहितीनुसार, सत्तरीतील वाढता जनक्षोभ हा सरकारला मारक ठरण्याची भीती असल्याने सत्तरीतील मेळावली येथील आयआयटी प्रकल्प तेथून हलवावा असा सूरच बैठकीत व्यक्त झाला. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री तशा आशयासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. कदाचित हा प्रकल्प फर्मागुढी अथवा संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या जागेमध्ये धारबांदोडा येथेही हलविला जाण्याची शक्यता आहे.