बेळगाव / प्रतिनिधी :
जिल्हा पंचायत कार्यालयात दररोज विविध समस्या मांडण्यासाठी जिल्हय़ातील नागरिकांची गर्दी होत असते. जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांना भेटून त्यांच्याकडे समस्यांचे गाऱहाणे मांडण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना अन्य महत्वाच्या कामासाठी कमी वेळ मिळत आहे. यासाठी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना भेटीसाठी दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत वेळ निश्चित केली आहे. तसेच याबाबत आपल्या कक्षासमोर फलकही लावला आहे. यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी येणारे नागरिक आता दुपारी 3.30 नंतर जि. पं. कार्यालयाकडे येत आहेत.
राज्यात बेळगाव जिल्हा मोठा असल्याने जिल्हय़ातील नागरिक आपल्या विविध समस्या आणि तक्रारी मांडण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात मोठय़ा संख्येने येत असतात. यामुळे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना या नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी बराचवेळ जात आहे. याचा परिणाम अन्य कामावर होत असल्याने नागरिकांसाठी त्यांनी ठराविक वेळ निश्चित केली आहे. दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत नागरिकांना त्यांची भेट घेता येणार आहे. मात्र महत्वाच्या प्रसंगी त्यांना सकाळच्या वेळेतही भेटता येणार आहे.