बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हा पंचायतच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकारीवर्गाच्या विरोधात सदस्यांनी गंभीर आरोप केले. तर भेंडवाड जि. पं. सदस्य निंगाप्पा पकांडी यांनी हेस्कॉमच्या रायबाग विभागीय अधिकाऱयांवर कारवाई करावी या मागणीसाठी सभागृहातच जमिनीवर ठाण मांडले. यावेळी सभागृहातील उपस्थित सदस्यांनीही पकांडी यांना पाठिंबा देत हेस्कॉम अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली यामुळे सभेच्या सुरूवातीलाच वातावरण तापले. मंटूर (रायबाग) येथील हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱयांकडून 11 लाख रुपये जमा केले होते. तसेच पकांडी यांच्याकडूनही दहा हजाराची मागणी केली होती. मात्र ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आला नाही.
शेतकऱयांची समस्या मांडण्यास गेलेल्या पकांडी यांच्यावर 20 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न या हेस्कॉम अधिकाऱयांनी केला असल्याचा आरोप पकांडी यांनी यावेळी केला. जि. पं. सदस्यांवरच हल्ले होत असल्यास सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित अधिकाऱयास सभागृहात बोलाविण्यात यावे, आणि त्याच्यावर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जि. पं. सदस्यत्वाचा राजीनामा देतो असे पकांडी यांनी सांगितले. तसेच मागणी मान्य करण्यासाठी सभागृहातच जमिनीवर ठाण मांडले. अन्य सदस्यांनीही पकांडी यांना पाठिंबा दिला तसेच संबंधित हेस्कॉम अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी करत जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांच्या आसनासमोर धरणे धरले. यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. यानंतर सदस्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आमदार श्रेय लाटत असल्याचा आरोप
शुक्रवारी जि. पं. सभागृहात जि. पं. ची सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी जि. पं. च्या अध्यक्षा आशा ऐहोळे होत्या. सकाळी 11 ची बैठक दुपारी 1 च्या सुमारास सुरू झाली. बैठक सुरू होताच पकांडी यांनी हेस्कॉम विभागीय अधिकाऱयांवर गंभीर आरोप केले. तर अन्य सदस्यांनी आपल्या कामाचे श्रेय संबंधित आमदार लाटत असल्याचे सांगितले. उचगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आमच्या अनुदानावर आमचा हक्क नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. शाळा दुरूस्तीसाठी अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न आम्ही करतो. आणि जि. पं. चा फंड म्हणून उल्लेख असतानाही कामाचे श्रेय आमदार घेत असतात. तर अधिकारीही माहिती देत नाहीत. यामुळे आमचा राजीनामा घ्या, असे सरस्वती पाटील यांनी सांगितले. उपस्थित बहुसंख्य सदस्यांनीही हीच तक्रार केली.
एपीएमसी ते हंदिगनूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी रस्ता कामासाठी पूजा करण्यात आली आहे. मात्र कामास अद्यापही सुरू झाली नसल्याचे सरस्वती पाटील यांनी सांगितले. याशिवाय मण्णूर, आंबेवाडी, उचगाव येथील रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाले आहेत. या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली. उचगाव क्षेत्रातील तलाठी वेळेवर कामावर हजर रहात नसल्याने पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱयांची कामे होण्यास विलंब लागत आहे. यासाठी तलाठय़ास समज द्यावी. तसेच तुरमुरी येथील कचरा डेपोसाठी यापुढे एक इंचही जमीन देणार नसल्याचे सरस्वती पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्राथमिक उपआरोग्य केंद्र 20 वर्षांपासून बंद
हिंडलगा जि. पं. सदस्या माधुरी हेगडे यांनीही आपल्या भागातील समस्या मांडल्या. हिंडलगा-सुळगे येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्र सुमारे 20 वर्षांपासून बंद आहे. याबाबत दोनतीन वेळा बैठकाही झाल्या मात्र अद्यापही सदर आरोग्य केंद सुरू करण्यात आले नाही. सदर केंद्र सुरू झाल्यास सुळगा, कल्लेहोळ, मण्णूर आदी भागातील नागरिकांची सोय होणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले.