बऱयाच सदस्यांना सोमवारपर्यंत अधिसूचना नाही, कोरोनाचे संकट असताना निवडणूक नको अशी मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पंचायत विविध स्थायी समित्यांच्या निवडणुका 4 रोजी होणार आहेत. मात्र या निवडणुकांबाबत बऱयाच सदस्यांना सोमवारपर्यंत अधिसूचना मिळाली नव्हती. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनाही सोमवारीच अधिसूचना मिळाली आहे. तर कोविड-19 च्या परिस्थितीत स्थायी समिती निवडणुका घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हा पंचायतचे 90 सदस्य असून स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान या सर्वांसाठी सोशल डिस्टन्स ठेवून आसन व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय अधिकारीवर्ग आणि कर्मचारी अशा सुमारे 100 हून अधिक जणांसाठी ही व्यवस्था आवश्यक आहे. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने या निवडणुका आताच घेण्याची घाई का? असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका पुढे घेतल्यास सोयीचे होईल असे काहींचे मत आहे. यापुढे स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना 20 महिन्यांचा पूर्ण कालावधी मिळणार नसून जेमतेम 9 ते 10 महिने त्यांना मिळणार आहेत. पुढील मार्चमध्ये जि. पं. सदस्यांचा कालावधी संपणार असून निवडणूक घ्यावी लागणार आहे. यासाठी सध्या असणाऱया स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांनाच मार्चपर्यंत संधी देण्यात यावी, अशी मागणीही काही सदस्यांनी केली आहे. गुरुवार दि. 4 रोजी होणाऱया स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान कोरम पूर्ण न झाल्यास ही निवडणूक पुढे ढकलणे अनिवार्य ठरणार आहे.
एकंदरीत जि. पं. च्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीवरून जि. पं. कार्यालयात सोमवारपासून जि. पं. सदस्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. काहींनी ही निवडणूक आताच घेऊ नये, अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या तारखेबाबत आपणास विश्वासात घेण्यात आले नाही, असे म्हणणे जि. पं. अध्यक्षांचे आहे. यामुळे या स्थायी समित्यांच्या निवडणुकीबाबत सर्व सदस्यांचे एकमत झालेले नाही. यामुळे ही निवडणूक सुरळीतपणे पार पडेल का? हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.