प्रतिनिधी / सांगली
भाजपाला सत्तेच्या बाहेर घालवण्यासाठी राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग सांगलीत फसला. भाजपाने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखत अध्यक्षपदी सौ. प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्षपदी शिवाजी डोंगरे यांची निवड केली. तर शिवसेनाही भाजपाच्या पाठीशी राहिली. राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी माघार घेतल्याने काँग्रेस आणि भाजपात झालेल्या थेट लढतीत भाजपाने आपले संख्याबळ राखण्यात यश मिळवले. काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर राहिले.
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी गुरूवारी झाल्या. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत लक्ष घातल्याने जिल्हा पातळीवरील नेत्यांचाही मेळ लागला. पण भाजपातील गैरमेळाचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनेही महाआघाडीची मोळी बांधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांनी चमत्काराचा दावा केल्याने निवडीमध्ये प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यामुळे गुरूवारी निवडीच्या वेळी जिल्हा परिषदेसमोर प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला होता.
पण, प्रत्यक्षात निवडीवेळी महाआघाडीचा बार फुसका निघाल्याचे आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच मेळ राहिला नसल्याचे स्पष्ट झाले. सहलीवरील भाजपाचे सदस्य वसंत बंगल्यावर तर काँग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादी कार्यालयात बसवण्यात आले होते. काँग्रेस आ. विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे आ.मानसिंगराव नाईक, अविनाश पाटील, यांच्यासह नेत्यांनी खलबते सुरू केली होती.
सेनेला उपाध्यक्षपदाची ऑफर
मॅजिक फिगर जमत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेला उपाध्यक्षपदाची ऑफर दिली. सुहास बाबर यांच्याबरोबर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आ. विक्रम सावंत, शरद लाड, जितेंद्र पाटील यांच्यासह काही मोजक्या सदस्यांनी चर्चा करत उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरा गणित जुळेल अशी गळ घातली. पण सुहास बाबर यांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी नाईक यांचा अध्यक्षपदासाठी आणि काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. पण निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने सौ. अश्विनी नाईक यांचा अर्ज माघार घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. पण, जिल्हा परिषदेमध्येच बसून असलेल्या आ. विक्रम सावंत यांनी कलावती गौरगौंड यांचा दाखल केलेला डमी अर्ज कायम ठेवण्यास सांगितला. त्यामुळे भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी थेट लढत झाली.
आघाडीचे संख्याबळ दोनने घटले
भाजपाच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांना प्रत्येकी 35 मते मिळाली. तर काँग्रेसच्या सौ. नाईक आणि जितेंद्र पाटील यांना प्रत्येकी 22 मते मिळाली. आ. अनिल बाबर यांची तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची दोन अशी पाच मतेही भाजपाच्या पारडय़ात पडल्याने त्यांचे संख्याबळ 35 वर पोहोचले. राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे आणि काँग्रेसच्या शारदा पाटील हे दोन सदस्य गैरहजर राहिले.
कोरेंच्या अर्जावर आक्षेप आणि वकिलांची फौज
उमेदवारी दाखल झाल्यानंतर भाजपाच्या उमेदवार सौ. प्राजक्ता कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर संजय पाटील, अश्विनी नाईक आणि कलावती गौरगौड यांनी हरकत घेतली. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज दाखल करण्यात आली. पण पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी कोरे यांचा जातीचा आणि पडळताळणीचाही दाखल प्राधिकृत अधिकाऱयांनी दिला असल्याचे सांगत आक्षेप फेटाळून लावला. त्यामुळे भाजपाची अस्वस्थता काही काळातच संपली. पण, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आ. विक्रम सावंत यांनी दिली.
निवडीनंतर केरे आणि डोंगरे समर्थकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जिल्हा परिषद आवारात जल्लोष केला. डोंगरे यांच्या काही उत्साही समर्थकांनी तर जेसीबीने गुलाल उधळला. तर कोरे यांच्या मिरज येथील समर्थकासह त्यांचे माहेर असलेल्या नागज येथील नातेवाईक आणि कार्यकर्त्यानीही गर्दी केली होती. भाजपा नेते गोपिचंद पडळकर आणि सौ. कोरे यांचे माहेर कानडे कुटुंबीयांचे संबंध अनेक वर्षापासून असल्याने त्यांच्या समर्थकांनीही जल्लोष केला.
भाजपा नेते ठाण मांडून
निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी खा. संजयकाका पाटील, आ. पृथ्वीराज देशमुख आणि सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. पण, ती विनंती अमान्य झाल्याने निवडणूक लागली. खा. संजयकाका पाटील, आ. पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, गोपिचंद पडळकर, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, सी. बी. पाटील यांच्यासह भाजपा नेते जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते. तर आ. विक्रम सावंतही आपल्या समर्थकासह जिल्हा परिषदेतच थांबून होते.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
आपल्या समर्थकासह प्राजक्ता कोरे यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तीवादासाठी वकिलांना पाचारण केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱयांनी हरकतीवर कागदपत्रे न घेता व वकिलांना सुनावणीची संधी न देता बेकायदा छाननी प्रक्रिया राबविल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांसह ऍड. अमित शिंदे यांनी केला. त्यामुळे पीठासन अधिकाऱयांविरोधात निवडणूक आयोग आणि बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती ऍड. अमित शिंदे यांनी केली. संपूण छाननी प्रक्रियेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली.