मंगळवार पासून समुपदेशनाला प्रारंभ, पहिल्या दिवशी 50 कर्मांचाऱयांच्या बदल्या
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्या शासनाच्या निर्देशांनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी बदल्यांना प्रारंभ झाला. मंगळवारी समुपदेशन प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यादिवशी एकूण 5 संवर्गातील 50 बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱयांच्या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदल्यांमधील राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो. हा मुद्दा अनेकांकडून प्रतिष्ठेचा बनवला जात असल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी शासनाने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संवर्गनिहाय 15 टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. बदल्यांसाठी समुपदेशनाचे वेळापत्रक तयार केले आहे.
जिल्हा परिषद जवळ लोकनेते कै.शामराव पेजे सभागृहात मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक, वाहनचालक, परिचर, हवालदार या संवर्गातील एकूण 50 बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जि. प. अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष महेश नाटेकर, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते.
बुधवारी ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका, कृषी विभागातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, चौकीदार तर प्राथमिक शिक्षक असे समुपदेशन होणार आहे.