दुचाकी रस्त्यावर उभ्या- सोशल डिस्टन्सचा फज्जा
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषद ते विसावा नाका या रस्त्यालगत फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. रस्त्यावर स्टॉल मांडून हे विक्रेते विक्री करत आहेत. याच ठिकाणी चारचाकी वाहनधारक पार्किंग करत आहेत. यामुळे रस्ता अरूंद झाल्याने प्रवासात अडथळा निर्माण होत आहे. मात्र या अतिक्रमणाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने या मार्गावर फळ मार्केट निर्माण झाले आहे.
अनलॉक नंतर अतिक्रमण पुन्हा वाढु लागले आहे. विक्रेत्यांना जागा नसल्याने रस्ता दिसेल तिथे थाट मांडला आहे. अशीच अवस्था जिल्हा परिषद चौक ते विसावा नाका या रस्त्यालगत निर्माण झाली आहे. फळ विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर उन्हाळयामुळे कलिंगड, द्राक्ष, टरबुज, संत्री, मोसंबी, सफरचंद्र, शहाळे अशी फळे विक्रीसाठी ठेवली आहेत. या मार्गाने वाहतूक जास्त असल्याने वाहनधारक प्रवासादरम्यान ही फळे विकत घेण्यास गर्दी करत आहेत. वाहने रस्त्यालगत उभी करत आहेत. यामुळे इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. चारचाकी वाहनधारकही याच ठिकाणी वाहने उभी करत आहेत. यामुळे येथे पार्किग पाईंट तयार झाला आहे. याकडे अनेक दिवसापासून प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यांचा फटका इतर प्रवाशांना बसत आहे.
वाहतूक पोलीस चौकात उभे
जिल्हा परिषद चौकात वाहतूक पोलीस उभे असतात. मात्र फक्त चौकापुर्तीच वाहतूक कोंडी सोडवण्यावर भर दिला जातो. या चौकात सिंग्नल यंत्रणाही आहे. पण ती बंद अवस्थेत आहे. यामुळे वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास येथे सुरू आहे. तरीही संबंधित प्रशासनाला जाग येत नाही.