प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषदेतील सभापती व उपाध्यक्ष अशा नवीन पदाधिकाऱयांची निवड 15 दिवसांनी होणार आहे. मात्र या सर्व पदाधिकाऱयांचे राजीनामे आज गुरूवारी जेप.अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे सादर होणार आहे. मात्र इच्छुकांनी रिक्त होणाऱया पदांच्या जागेसाठी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी त्याचा प्रभाव रत्नागिरीतील जिल्हा परिषद निवडीत दिसणार का? याबाबत राजकीय वर्तूळाच्या नजरा रोखल्या आहेत.
जिल्हा परिषद विषय समिती सभापती आणि उपाध्यक्ष पद भूषवत असलेल्या पदाधिकाऱयांचा कार्यकाल सत्ताधारी शिवसेनेच्या फॉर्म्युल्यानुसार संपल्याने यांचे राजीनामे आज घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत 55 पैकी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे 39 सदस्य आहेत. संघटनास्तरावर सर्व सदस्यांना पद भुषविण्याची संधी दिली जात आहे. त्यासाठी सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली जात आहे. सेनेत सत्ताधारी सदस्यांची पदाधिकारी म्हणून निवड करताना आतापर्यंत टर्म देण्यात आल्या आहेत. आता पाच वर्षातील उर्वरित सव्वा वर्षासाठीची निवड होणार आहे. त्यासाठी विद्यमान पदाधिकाऱयांचे राजीनामे घेतले जाणार आहेत.
त्यानुसार आज गुरूवारी उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे, आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजीन चिंगळे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. सर्व पदाधिकारी आपले राजीनामे अध्यक्ष बने यांच्याकडे सादर करणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जि.प.मधील काही राष्ट्रवादीच्या सदस्यांकडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र सत्ताधारी असलेली शिवसेना येथील सत्ताकारणात राष्ट्रवादीला कितपत सामावून घेणार याकडे लक्ष वेधले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर सात सदस्य सेनेत आले होते. आमदार जाधव यांचे सुपूत्र विक्रांत यांचाही समावेश आहे.त्यांनी सेनेत जाहीर प्रवेश केलेला नाही. विक्रांत यांचे नाव अध्यक्ष पदासाठीही चर्चेत आहे. सदस्या नेत्रा ठाकुर यांना उपाध्यक्ष किंवा अन्य पदावर काम करण्याची संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेकडून सदस्य असलेल्या रश्मी झगडे, स्वप्नाली पाटणे, परशुराम कदम, चंद्रकांत मचणेकर, पूजा नामे, लक्ष्मी शिवलकर याची नावे पदाधिकारी निवडीसाठी अग्रणी असल्याचे सांगितले जात आहे.