पंचायत राज समिती लवकरच पुढील महिन्यात दौऱयावर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर अंकुश ठेवणारी पंचायत राज समिती अर्थात ‘पीआरसी’ सिंधुदुर्ग जिल्हय़ात पुढील महिन्यात येणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर ही समिती जिल्हा परिषदेला भेट देत लेखाजोखा घेणार आहे. त्यामुळे जि. प. प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी पूर्वतयारीच्या बैठका सुरू केल्या असून सर्व विभागांचे खातेप्रमुख तयारीला लागले आहेत.
शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱया विविध प्रकारच्या निधीचा विनियोग शासन निर्णयानुसार झाला की नाही? लेखापरीक्षण अहवालातील नमूद उणिवा याबाबत पंचायत राज समिती तपासणी करते. जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी येणाऱया या पंचायत राज समितीचा चांगलाच धसका घेतला जातो. ही समिती यापूर्वी सन 2008-09 आणि सन 2011-12 मध्ये जिल्हय़ात आली होती. त्यानंतर ती 2015-16 मध्ये येणार होती. पण या समितीचा दौरा अनेकदा तहकूब झाला. मात्र, यंदा ती पुढील महिन्यात दाखल होत आहे.
दरम्यान, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी या पीआरसी संदर्भातील पूर्वतयारीची एक बैठक घेतली. लेखापरीक्षण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी लेखापरीक्षणात घेतलेल्या गंभीर स्वरुपाच्या आक्षेपांबाबत ही समिती लक्ष देते. तसेच शासन निर्णय तसेच शासकीय धोरणाविरोधात कामकाज झाल्यास त्याचीही दखल घेत असते. सन 2015-16 च्या कामकाजाची व लेखा परीक्षकांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची ही समिती पडताळणी करते. त्याशिवाय शासन निर्णयानुसार नियुक्त्या, बढत्या व निधीचा विनियोग, सामाजिक आरक्षणानुसार दिले जाणारे लाभ याविषयी ही समिती तपासणी करते.