ग्रामीण भागातील महिलासाठी ठरतेय वरदान
गौरी आवळे/ सातारा
बदल्या काळाप्रमाणे लग्न करणे आणि त्यापेक्षाही ते टिकवणे आजच्या तरूण पिढीपुढे आव्हान झाले आहे. कुटुंबात होणारे वाद, तडजोड, योग्य समुपदेशन ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून 2002 साली साताऱयात जिल्हा परिषद कार्यालयात मोफत समुपदेशन व मदतकेंद्र सुरू करण्यात आले. या मार्फत अनेक कुटुंबातील पती-पत्नी यांच्या संसाराला दिशा देण्याचे काम गेल्या 18 वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग सहमतीने महिला व बाल कल्याण विभागातर्गत सातारा जिल्हा परिषद पुरस्कृत महालक्ष्मी महिला मंडळ अध्यक्ष प्रतिभा माळी, मायणी संचलित ‘समुपदेशन व मदतकेंद्र’ शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरत आहे. केंद्रात कौटुंबिक हिसाचाराला बळी पडलेल्या महिला तक्रार दाखल करतात. फोनद्वारे, प्रत्यक्ष केंद्रात येवून भेट देतात. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांना पत्राद्वारे बोलवून वादाचे कारण समजून घेतले जाते. त्यावर पती-पत्नीसह कुटुंबातील सदस्यांनाही समुपदेशन केले जाते. दोघांना त्यांच्या चुका दाखवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. पत्नीला मारहाण करू नये, तिला खर्च देण्यात यावा, मुलांवरील तिचा हक्क हिरावून घेवू नये असे लेखी स्वरूपात पतीकडून लिहून घेतले जाते. महिला पुन्हा नांदण्यासाठी गेल्यावर दर आठ दिवसांनी फोन करून कोणता त्रास नसल्याची खात्री केली जाते. कौटुंबिक वादासोबत सल्ला, मालमत्ता विषयक, लैगिंक हिंसा, सामाजिक अशा दररोज दोन-तीन केसेस दाखल होतात. सर्व प्रकरणावर योग्य समुपदेशन केले जाते.