प्रतिनिधी/ रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील रस्त्याच्या कामावरुन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बाळशेठ जाधव आणि विक्रांत जाधव या काका-पुतण्यांमध्ये जोरदार चर्चा झडली. चर्चेचे पडसाद पाहता जि.प.अध्यक्ष रोहन बने यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा यापूर्वी दोनवेळा रद्द झालेली होती. शुक्रवलारी जि.प.अध्यक्ष रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पुन्हा घेण्यात आली. त्यावेळी सभागृहात कमीत कमी लोकांचा सहभाग ठेवून सोशल डिस्टसिंगची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपिठावर गर्दी टाळण्यासाठी सभापतींना बसण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आली होती. या सभेत तुरंबव येथील रस्त्याच्या झालेल्या कामांपेक्षा अधिकचे पैसे काढून दिल्याचा ठपका सदस्य विक्रांत जाधव यांनी ठेवला. कामाची एमबी ग्रामपंचायतीत उपलब्ध नव्हती असा अहवाल दिला होता. जिल्हा परिषदस्तरावरुन चौकशी लावल्यानंतर ती एमबी सादर करण्यात आली होती. मात्र त्यांचे आरोप बाळशेठ खोडून काढले. अशाप्रकारे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे बाळशेठ यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी सभेतील जोरदार चर्चेनंतर या कामाची सविस्तर माहिती घेण्यात येईल असे अध्यक्ष बने यांनी सांगितले.