‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर घेतला उभयतांनी निर्णय : जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, पोलीस अधीक्षक देणार वधूवरांना शुभाशीर्वाद : सारं जकातवाडी गाव होणार वऱ्हाडी : महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना : मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्यक्ष कृतीतून चपराक
तरुण भारत प्रतिनिधी/सातारा
सध्या साऱ्या राज्यात विधवा सन्मान हा विषय घेऊन ठराव होऊ लागले आहेत. मात्र केवळ सन्मान नव्हे तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन आणि अनुदान देणारी देशातली पहिली ग्रामपंचायत आहे. याच गावात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त एका विधवा महिलेचा पुनर्विवाह मोठ्या थाटात होत असून राज्याने जीआर काढल्यापासूनचा हा पहिला विवाह ठरला आहे. विशेष म्हणजे लग्न करणाऱ्यांपैकी दोघे इतर गावातले असले तरी सारी जकातवाडी उद्या वऱ्हाडी होणार आहेत. उद्याचं हे लग्न चुकीचा जीआर काढणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही चपराक ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावानं विधवेचं कुंकू पुसु नये, बांगड्या फोडू नये असा सन्मान ठेवणारा ठराव केला की त्याच जिल्ह्याचे असलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी हेरवाडच्या नावाने जीआर काढला. वास्तविक सातारा जिल्ह्यातील जकातवाडी गावाने त्या आधी म्हणजे 2018 मध्ये केवळ सन्मान नव्हे तर विधवापुनर्विवाह आणि त्यासाठी प्रत्येकी 25 हजार अनुदान देण्याचा देशातील पहिला ठराव केला होता.
मंत्री मुश्रीफ यांनी जीआर मध्ये जकातवाडीचा नामोल्लेख न केल्याने त्या विरोधात “तरुण भारत”ने एक लढा उभा केला. त्यात आमदार शिवेन्द्रराजे यांनी मुश्रीफ यांना पत्र लिहून आपले योगदान दिले.
सध्या राज्यात विधवा सन्मानाचे केवळ कागदोपत्री ठराव केले जात असताना याच क्रांतिकारी जकातवाडीने प्रत्यक्ष कृतीतून पाऊल उचलले आहे.
‘तरुण भारत’ने उभारलेला हा लढा राज्यभर झाला. त्यातूनच खेड ता. सातारा येथील प्रा. रमेश शिंदे यांनी नूने येथील अंगणवाडी शिक्षिका शैला मोरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रा. यांच्या घरी तर कोणीच नाही. शिवाय कोण्या विधवेचं लग्न असं कुठं थाटा माटात होतं होय? अश्यावेळी लग्न कुठं आणि कसं करायचं? हा प्रश्न त्या उभयतांपूढे उभा राहिला तेंव्हा त्यांच्या पुढे जकातवाडीचं नाव आलं.
त्यांनी जे डोक्यात आलं ते जकातवाडीत जाऊन सांगितलं आणि बघता बघता सरपंच उत्तम सणस, माजी सरपंच चंद्रकांत सणस, ऐतिहासिक ठराव मांडणारे राजेश भोसले, तंटा मुक्तीचे जनार्धन भोसले, उपसरपंच हणमंत भोसले, डॉ. सचिन भोसले, सचिन जाधव यांच्या सह सारं गाव वऱ्हाडी व्हायला एका पायावर तयार झालं.
विवाह होणार सत्यशोधक पध्दतीने
जकातवाडी गाव हे पुरोगामी विचारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात रविवारी होणारा विवाह हा सत्यशोधक पध्दतीने होणार असून यास सगळे गाव दोघांचे वराडी म्हणून असणार आहेत. रमेश शिंदे आणि शैला मोरे यांच्या दि.26रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या विवाह सोहळ्याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीच्या प्रा. कविता म्हेत्रे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून जीआरमध्ये जकातवाडीचा उल्लेख व्हावा म्हणून प्रयत्नही केले होते.
सरकारी अधिकारी देणार शुभाशीर्वाद
या ऐतिहासिक घटनेला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी आपणहून उपस्थित राहणार आहेत.
मंत्री मुश्रीफ यांना कृतीतून चपराक
हेरवाडच्या नावाने जीआर काढताना जकातवाडीचा विसर पडलेला मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यात बदल करण्याबद्दल अनेकांनी सांगितले मात्र त्यांनी तो बदल केला नाही. वास्तविक, देशात मोठा निर्णय घेणाऱ्या जकातवाडीकरांना त्याचा काही फरक पडत नाही. मात्र कागदोपत्री घोडे नाचवणाऱ्या मुश्रीफ यांना जकातवाडीकरांनी प्रत्यक्ष कृतीतून चपराक दिल्याचे मानले जात आहे !