मिस्टर इंडिया संग्राम चौगुले यांनी व्यक्त केली चिंता, बेळगावला धावती भेट
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या काळात सर्व जीम व व्यायामशाळा बंद पडल्यामुळे अनेक शरीरसौष्ठवपटूंचे वजन वाढले. त्याचप्रमाणे स्पर्धा नसल्यामुळे अनेक शरीरसौष्ठवपटू डिप्रेशनमध्ये गेल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची चिंता व्यक्त करून सरकारने जीम व व्यायामशाळा नियम व अटी ठेवून कायम चालू ठेवल्या तरच शरीरसौष्ठवपटू शरीराचा समतोल ठेवू शकतात, असे मिस्टर इंडिया संग्राम चौगुले ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
हॉटेल सन्मान येथे आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आले असता ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे सर्व व्यायामशाळा व जीम कोरोनामुळे बंदच होत्या. प्रत्येक वर्षी 20 ते 25 मोठय़ा स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी प्रत्येक शरीरसौष्ठवपटू 5 ते 7 लाख खर्च करून स्पर्धेची तयारी करतात. त्यामध्ये यश संपादन करून नोकरीसाठी धडपड करीत असतात. पण गेल्या दोन वर्षापासून स्पर्धा झाल्या नसल्याने तसेच वय निघून गेल्याने अनेक शरीरसौष्ठवपटूंचे करीअर धोक्यात आले आहे.
सध्या फिटनेसची क्रेझ वाढत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक गावात, खेडय़ात जीम व व्यायामशाळा सुरू कराव्यात. कारण तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना जीम व फिटनेसकडे वळवणे आवश्यक आहे आणि अनेक तरुण याकडे वळताना दिसत आहेत. तरुणांनी उत्तम आहार, वॉकिंग, धावणे, सायकलिंग व घरी बसल्या व्यायाम व योगासने करावीत. त्याने शरीर निरोगी व सदृढ राहील.
महाराष्ट्रातील काही तरुण शरीरसौष्ठवपटू कोरोनाच्या काळात निधन पावले. याचे कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. कारण अनेक स्पर्धा निश्चित झाल्या होत्या पण त्या अचानक रद्द केल्याने ते शरीरसौष्ठवपटू डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. याचाच त्यांना फटका बसला. प्रत्येक जीम इन्स्ट्रक्टरने शरीरसौष्ठवपटूंना स्पर्धेअगोदर व नंतर कशाप्रकारे कसरत करावी व येणाऱया परिस्थितीला कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नैराश्य टाळण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.
बेळगावात जीम व व्यायामशाळा मोठय़ा प्रमाणात आहेत. बेळगावने अनेक शरीरसौष्ठवपटू घडविले आहेत. महाराष्ट्रात बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंबद्दल आदर आहे. बेळगावमध्ये जीम व फिटनेस ट्रेनिंग सुरू करण्याचा विचार आहे. लवकरच जागा पाहून येथे संग्राम फिटनेस जीम सुरू करण्याचा विचार आहे. बेळगावकरांचे माझ्यावर प्रेम असल्याने येथे जीम बनविण्याचे स्वप्न बाळगले आहे आणि ते मी पूर्ण करणारच, असे त्यांनी सांगितले. यावेळी सौ. स्नेहल संग्राम चौगुले, अमीर नदाफ, रणजित चौगुले, भरत पाटील, ऋतुराज चौगुले आदी उपस्थित
होते.