संचारबंदीत 19 पर्यंत वाढ : दुकाने 12 तास खुली राहणार,मास्क, सामाजिक अंतराची सक्ती कायम
प्रतिनिधी /पणजी
राज्यव्यापी संचारबंदीत आणखी एका आठवडय़ाने वाढ करण्यात आली आहे. यावेळी 50 टक्के उपस्थितीत जीम तसेच प्रेक्षकांशिवाय क्रीडा प्रकल्प आणि जास्तीत जास्त 15 भाविक भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक स्थळे खुली करण्यास सूट देण्यात आली आहे.
दुकांनाच्या वेळेमध्येही आणखी एका तासाने वाढ देताना सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सामाजिक अंतराचे पालन करणे सक्तीचेच असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुकानांना आणखी एक तासाची वाढ
सरकारने रविवारी केलेल्या घोषणेनुसार संचारबंदीची मुदत दि. 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. गत आठवडय़ात संचारबंदीत वाढ करताना दुकांनाना सायंकाळी 6 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली होती. त्याचबरोबर हॉटेल्स, मद्यालये, केशकर्तनालये, जीवनावश्यक दुकाने, क्रीडा संकुले (बाह्य विभाग) यांना अंशतः किंवा किमान 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्यास सूट, अनुमती देण्यात आली होती. आता सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत म्हणजेच 12 तास खुली राहणार आहेत.
धार्मिक स्थळांवर 15 माणसांची परवानगी
या पार्श्वभूमीवर कालपासून वाढविण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत 50 टक्के उपस्थितीत व्यायामशाळा, प्रेक्षकांशिवाय क्रीडा प्रकल्प आणि जास्तीत जास्त 15 माणसांच्या उपस्थितीत धार्मिक स्थळे खुली करण्यास सूट देण्यात आली आहे. सविस्तर आदेश लवकरच काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.