प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल हे ब्रिटीशकाळातील आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी कित्येक वर्षात एक रूपयाही दिलेला नाही. असे असताना त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडीटवर खर्च कशासाठी? पोस्टमार्टम केल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो का? असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱयांना केला.
स्ट्रक्चरल ऑडीटसाठी गुरूवारपासून दोन दिवस वाशिष्ठी पुल चार तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, माजी सरपंच विकास गमरे यांच्यासह पदाधिकाऱयांनी बुधवारी महामार्गचे उपविभागीय अधिकारी आर. आर. मराठे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेत पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणारे सरकार स्ट्रक्चरल ऑडीटवर पैसा कशासाठी खर्च करत आहे असा सवाल करण्यात आला. या पुलाची क्षमताच संपुष्टात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
येणाऱया जाणाऱया वाहनांमुळे कमकुवत झालेला हा पूल हलतो. महाडसारखी मोठी दुर्घटना घडल्यानंतच यंत्रणा जागी होणार का? असा सवाल करत आमचा या तपासणीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर मराठे यांनीही पुलाची तपासणी हेऊन शिक्कामोर्तब झाल्याशिवाय कोणताच निष्कर्ष काढता येत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर लवकरच नव्या पुलाचे काम सुरू होणार असून ते पूर्णत्वास जाईल, अशा पध्दतीने काम होणार आहे. नवीन पुलासह अन्य प्रश्नांसंदर्भात कंत्राटदार कंपनी, अधिकारी आणि आपणा सर्वांबरोबर लवकरच बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन मराठे यांनी दिले.