प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रस्त्यांचा विकास करण्याबरोबर गटारांचे बांधकाम करण्यात येत आहे. पण या विकास कामामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय होण्याचे प्रकार वाढले आहेत. आरटीओ चौकात गटारीचे बांधकाम अर्धवट झाल्याने उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा, वाहनधारक आणि पादचाऱयांना जीवघेण्या बनल्या आहेत. या ठिकाणी कोणताही अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे नागरिकांच्या समस्येत भर पडत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया रस्ते व गटारींचे बांधकाम अर्धवट असल्याने अनेकांना जीव गमवावे लागले तरीदेखील स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांसह प्रशासनाला जाग आली नाही. ठिकठिकाणी अर्धवट असलेले रस्ते आणि गटारींचे बांधकाम जीवघेणे ठरत असतानादेखील कारवाई होत नसल्याने आणखी किती बळी हवे आहेत, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गटारीचे बांधकाम आणि काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. पण सदर कामे वेळेत आणि व्यवस्थित करण्याकडे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांशेजारी गटारांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून काही ठिकाणी गटारांचे बांधकाम रखडले आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी लोखंडी सळय़ा उघडय़ावर सोडण्यात आल्या आहेत. बांधकाम अर्धवट झाल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी ठिकठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
आरटीओ कार्यालयासमोर स्मार्ट बसथांबा उभारण्यात आला. त्याकरिता गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर गटारीचे बांधकाम शिवाजीनगरमध्ये जाणाऱया रस्त्यापर्यंत करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या शेजारी बांधकाम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा जीवघेण्या ठरत आहेत. या ठिकाणी आरटीओ चौक अरुंद असल्याने वाहनांची गर्दी होत असते. या परिसरात आरटीओ कार्यालयात ये-जा करणाऱया नागरिकांची गर्दी आणि वाहनांची गर्दी दररोज होत असल्याने हा चौक गजबजलेला असतो. त्यामुळे अर्धवट गटारीचा धोका अधिक आहे. याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. सदर धोकादायक सळय़ा हटविण्यात याव्यात किंवा गटारीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.