अध्याय अकरावा
नाथ महाराज आपल्याला भागवतातील भगवंतांचे विचार सविस्तर उलगडून सांगत आहेत. भगवंत उद्धवाला सर्वत्र अद्वैत कसे भरून राहिले आहे ते समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, उद्धवा सर्वांच्या देहात मी आत्म्याच्या स्वरूपात वास करतो. शरीरातील घडामोडी तसेच देहाच्या हालचाली साक्षीरूपाने पहात असतो. मी माझ्यातील ऊर्जा देहाला पुरवतो म्हणून देह चैतन्यपूर्ण होतो व चलनवलन करू शकतो. देहातील आत्मा म्हणजे मी देह सोडून गेलो की शरीर थंड गोळा होऊन पडते. ते स्वतःहून कुठलीही हालचाल करू शकत नाही. खरं म्हणजे माणसाला हे सर्वत्र डोळय़ासमोर दिसत असते तरीपण सर्व स्वबळावर करत आहोत असा खोटा आव तो नेहमीच आणत असतो. सदैव निरनिराळय़ा इच्छा करत असतो. त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून धडपडत असतो. त्यावेळी त्याला माझी कधीही आठवण होत नाही. ज्यांना माझी आठवण होते त्यांना ते कर्ता नसून मी म्हणजे ईश्वर कर्ता आहे याची जाणीव असते आणि त्या जाणिवेमुळेच ते सर्वांशी हसूनखेळुन वागत असतात. सर्वांवर प्रेम करत असतात. आहे त्यात समाधानी असतात. त्यांना मोह, लोभ, मत्सर इत्यादि षड्रिपु त्रास देत नाहीत कारण ते सर्वत्र मला पहात असतात. जरी प्रत्येक प्राणीमात्राचा आकार, देहयष्टी, चेहरामोहरा वेगवेगळय़ा पद्धतीचा असला तरी प्रत्येकातील आत्मा हे माझेच स्वरूप असते. त्यात कधीही भिन्नता नसते. जरी प्रत्येक मनुष्य तुझ्या नजरेसमोर हालचाल करताना तुला दिसत असला तरी हे सगळे खोटे आहे हे लक्षात घे. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात हालचाल करायला लावणारा, बोलायला लावणारा सूत्रधार एका बाजूला बसून हे सर्व घडवून आणत असतो. म्हणजेच तो सूत्रधारच खेळातील बाहुल्यांचा कर्ता करविता असतो हे सत्य तू सहजी स्वीकारतोस तसेच या विश्वाचा सूत्रधार मी आहे हे लक्षात घे. सर्व प्राणीमात्रांवर माझी सत्ता चालते. हे सर्व माझ्या आधीन आहेत म्हणून तुला जरी हे सर्व प्राणी हलताना, माणसे बोलताना दिसत असली तरी त्यांचे अस्तित्व माझ्यावर अवलंबून आहे. माणसे इंद्रीयभोगात सुख आहे असे समजतात पण तसे नसून जो माझे खरे स्वरूप जाणतो तोच चिरंतन सुखात असतो. ही नाना प्रकारची रूपे व नाना प्रकारचे धर्म, नाना प्रकारची नामे व नाना प्रकारचे कर्म, हे सगळे मी आत्मारामच आहे. मीच हे सर्व विश्व व्यापले असून इथे इतर कुणाला जागाच नाही मग ते कायम अस्तित्वात असतीलच कसे. जोपर्यंत माझी लीला चालू आहे तोपर्यंतच यांच्या उडय़ा मारणे चालू असते. नास्तिकाच्या दृष्टीने मी कधीच कुठेही नसतो आणि ज्याच्यात आस्तिक्मयबुद्धी असते, त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा असतो. मी सर्वात्मा, सर्वव्यापक आहे असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो, तो माझा आवडता भक्त होतो आणि त्यालाच माझा ज्ञानठेवा मिळतो. आत्म्याच्या रूपाने मी मनुष्याच्या देहात वास करत असतो पण जो माझा एकनि÷ भक्त असतो त्याच्याबाबतीत उलटेच घडते. तो आणि मी एवढे एकरूप झालेलो असतो की तो माझा आत्मा होतो आणि मी त्याचा देह बनतो. उद्धवा, ‘एकात्मभक्ती’ ती हीच. मी माझ्या भक्ताचा देह झाल्याने त्याची कामेसुद्धा मला करावी लागतात आणि मला त्यात बिलकुल कमीपणा वाटत नाही. म्हणून मी अर्जुनाच्या घोडय़ाना खरारा करत असे. ज्यांना माझी प्राप्ती कशी होते हे माहीत आहे ते भक्तीने माझे भजन करतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद प्रीती असते. याकरिता तूही याच रीतीने भजन कर. परमात्मा एक, नित्य व शुद्ध आहे. त्याला मायामय संसारबंधन नाही आणि देहसंबंधही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. हाच माझा खरा ‘आत्मबोध’ होय. अद्वैतभजनाने जे भजतात, तेच कृष्णाला आवडतात असे उद्धवाच्या लक्षात आले. जे भक्त ईश्वर सर्वव्यापी असून स्वतंत्र आहे हे लक्षात घेतात ते देहात असून विदेही असतात. म्हणजे ते देहात राहून सर्व हालचाली करतात पण त्यांच्या त्या हालचाली स्वतःच्या प्रेरणेने नसून ईश्वरी प्रेरणेने होत असतात. त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन देही असून विदेही अवस्थेचा आनंद हे जीवन्मुक्त भक्त घेत असतात.
क्रमशः