चिराग पासवान यांच्याकडून उपरोधिक टिप्पणी- नितीश कुमार पुन्हा लक्ष्य
वृत्तसंस्था/ पाटणा
इंडिगोचे स्थानिक व्यवस्थापक रुपेश सिंग यांच्यावर हत्येपासून बिहारमधील नितीश कुमार सरकारवरील टीकेची धार तीव्र झाली आहे. या हत्याप्रकरणाचा बुधवारी पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राजकीय वर्तुळातूनही शाब्दिक हल्ले केले जात आहेत. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यानंतर लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनीही राज्य सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. शनिवारी पाटणा येथे परतलेले चिराग यांनी पत्रकारांशी बोलताना बिहारमध्ये ज्याप्रकारे हत्या होत आहेत, ते पाहता राज्याच्या लोकांनी स्वतःचा जीवन विमा उतरविणेच योग्य ठरणार असल्याची उपरोधिक टिप्पणी केली आहे.
लोकशाहीत सर्वांना स्वतःच्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. शेतकरी आंदोलकांचे म्हणणे सरकार ऐकत नसल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार असल्याचे उद्गार चिराग यांनी काढले आहेत.
पासवान यांनी रुपेश सिंग हत्याप्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करविण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लिहिले आहे. हत्येचा तपास पाटणा पोलिसांनी केला असून याला रस्त्यावरील भांडण ठरवून तो बंद करण्यात येत आहे. बिहार पोलिसांच्या चौकशीवर रुपेश सिंग यांच्या कुटुंबातील एकही सदस्य समाधानी नाही. याचमुळे मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी सीबीआयला सोपवावी. रुपेश सिंग यांचे ज्येष्ठ बंधू कित्येक वर्षांपासून संयुक्त जनता दलाचे नेते राहिले आहेत असे चिराग यांनी म्हटले आहे.