प्रतिनिधी / कोल्हापूर
रोजच्या जगण्याची लढाई, अभ्यासाचे ओझे, घरातील ताण तणाव यासोबतच रोजच्या जगण्यात येणारे नैराश्य सहन न झाल्यामुळे आत्महत्येकडे पाउल वळते. जिह्यात दोन दिवसात तिघेजण आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे धक्कादायक चित्र आकडेवारीवरुन उघडकीस आले. आत्महत्येमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून महिलांच्या तीनपट ही आकडेवारी आहे.
रागीट, आततायी, हट्टी, टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तेमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते. मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते. याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते. ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात, ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.
आता 15 ते 25 वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. या वयोगटात अभ्यासाचा ताण, परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत. यानंतर 25 ते 50 वयोगटातील व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाणही आहे. या वयोगटामध्ये मनासारखी नोकरी, पगार न मिळणे, करिअरमध्ये अपयश, लग्न न ठरणे, मित्रांच्या तुलनेत अपयशी ठरणे, विवाह जुळल्यास तो न टिकणे, घरगुती वाद, नवरा बायकोचे भांडण, सतत येणारे अपयश अशी कारणे आहेत. वयाच्या 50 नंतरही आत्महत्येचे प्रमाण आहे. जबाबदारीचे ओझे न पेलणे, शारिरीक व्याधी, विभक्त कुटूंब पद्धती, मुले नोकरी शिक्षणा निमीत्त परदेशात असल्यामुळे येणारे एकटेपण अशा विविध कारणांमुळे या वयोगटातील व्यक्ती आत्महत्येचे पाउल उचलतात.
गेल्या तीन वर्षातील आकडेवारी
वर्ष महिला पुरुष एकूण
1 2018 140 463 603
2 2019 135 444 560
3 2020 195 402 597
आत्महत्येची कारणे
– विभक्त कुटूंब पद्धत
– तापट स्वभाव, सहनशक्तीचा अभाव
– हरवत चाललेला संवाद
– मोबाईलमुळे येत असलेले एकटेपण
– नैराश्य
– लॉकडाउन नंतरची परिस्थीती
– टोकाची ईर्ष्या, अभ्यासाचा तणाव, मानसिक दडपण
हे आहेत उपाय
– ईर्ष्या, जगण्यातील स्पर्धा कमी करणे
– साधी राहणी, गरजांचे प्रमाण कमी ठेवणे
– मुलांवर अभ्यासाचे किंवा अपेक्षांचे ओझे लादू नये
– एकत्र कुटूंब पद्धती
– व्यायाम, योगा, यावर भर देणे
– मोबाईल, इंटरनेटचा वापर कमी करणे
– मित्र, मैत्रिणी, किंवा नातेवाईकांशी संवाद ठेवणे
– सहनशक्ती वाढवणे
– मानसोपचार तज्ञ, समुपदेशकांची भेट
भितीचे आजार, नैराश्य, व्यसनाधिनता यामुळे आत्महत्येचे विचार मनात येतात. आत्महत्येचा विचार एका दिवसामध्ये मनात येत नसतो. तो विचार सतत घोंघावत असतो. या विचारामुळे त्या व्यक्तिमध्ये होणारे बदल नातेवाईकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. हा बदल लक्षात घेवून त्याच्याशी संवाद साधावा तसेच त्याच्यावर योग्य तो उपचार करावा.
डॉ. पवन खोत, विभाग प्रमुख, सिपीआर मानसोपचार विभाग