अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, मनुष्य दुःखामागून दुःखे का भोगतो त्याची कारणे मी तुला सांगतो.
ज्याचा देह ‘पराधीन’ म्हणजे मायेच्या आधीन असतो, तो जिवंतपणी अत्यंत केविलवाणा बनतो. वास्तविक पाहता चालू जन्मातली मनुष्याची ओळख म्हणजे नाव, गाव, कूळ हे सर्व तात्पुरतं असतं. कारण तो ब्रह्माचा अंश असल्याने त्याचं कूळ ब्रम्हाचं असतं पण मायेच्या आधीन झालेला मनुष्य हे लक्षात न घेता, स्वतःला दृश्य जगाचाच भाग समजतो व मायेच्या आधीन होतो. म्हणजे पराधीन होतो तो कधी स्वप्नातसुद्धा सुखी होत नाही. स्त्री जर पुरुषाला अनुकूल नसली, तर तिच्यामुळे त्याला दुःख होते. कुपुत्रापासून आईबापांना रात्रंदिवस दुःखच प्राप्त होते. पदरी ‘द्रव्य’ असून ते सत्पात्री दान न करणे हेच सर्व दुःखाचे मूळ होय. म्हणून द्रव्यलोभ्याला भयंकर दुःख भोगावे लागते. सत्पात्री दान न करिता ज्याने कुबेराचे धन रक्षण करून ठेविलेले असते, त्याचे ठिकाणी अतिशय दुःखामुळे विघ्ने उत्पन्न होतात आणि त्यात धर्माचे रक्षण होत नाही. अशा रीतीने राखलेलेही द्रव्य गेले तर मग त्यासाठी अत्यंत दुःखाचा भडका उठतो. म्हणून श्रीमंतांना शेकडो जन्म घ्यावे लागतात व ते कोटय़वधी दुःखेच भोगीत असतात. आता वाणीबद्दल सांगतो ऐक, नरदेहाला येऊन ज्याला अव्यंग वाणी प्राप्त झालेली आहे आणि तरीदेखील जो हरिनामाचा उच्चार करीत नाही, त्याच्यापाशी पातक हे ठेवलेलेच आहे. आसन, ध्यान, ह्यांच्या खटपटीत न पडता जो राम राम म्हणतो, त्याच्या कोटय़वधी जन्मातील कष्टांचा परिहार त्यायोगाने होतो. तीच वाणी अति उत्तम होय. जो नित्य रामनामाचा जप करतो, तो परमेश्वरस्वरूपच असतो. चतुर्वर्णामध्ये जो वाणीने रामनामाचा जप अविश्रांत करील, तोच माझा आवडता होतो. त्रिभुवनातही मला त्यावाचून दुसरा कोणी आवडता नाही. जो अखंड रामनामाचा जप करतो त्याची वाणी पवित्र असते. रामनामाचा जप थांबला की तीच वाणी खोटे बोलून मलिन होऊ लागते तिला परनिंदेची घाण सुटते. असल्या वाणीत खरोखर अधर्माचे किडे पडतात आणि ते चहूंकडे वळवळू लागतात. अशी वाचा असलेला मनुष्य कुणालाच आवडत नाही. ती वाणी लहानथोर सर्व माणसे त्या मनुष्याला टाळत असतात. त्या वाणीची जी दुर्गंधी असते ना, ती मला सुद्धा सहन होत नाही. अशी वाणी जो बाळगतो तो दुर्बुद्ध होय. त्याच्यावर अनर्थ ओढवतात व अत्यंत दुःखे प्राप्त होतात. त्याची वाणी म्हणजे गाळीव दुःखातले मोठे दुःखच होय असे समज. मग ती वाणी वेदशास्त्र पढलेली का असेना ? नामकीर्तनाची जो निंदा करतो, तो महापातक्मयाहूनही मोठा पातकी होय. त्याच्यामुळे पृथ्वीला सुद्धा अतिशय पीडा होते. नामकीर्तनानेच वाणी कशी धन्य होते, ह्याचे निरूपण भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, माझी नामे, कर्मे आणि गुणांची कीर्ति ही जगाला पवित्र करतात व महान् दोषांना नष्ट करतात. हरिनामस्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो. त्यावर उद्धवाने विचारले की, “भगवंता तू अतीत असा ब्रह्मस्वरूप आहेस. मग तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे? आणि कीर्तनधर्म तरी घडणार कसा ?’’ भगवंत म्हणाले, उद्धवा ! असे तू मनात आणू नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करतो, अनेक अवतार धारण करतो आणि काही न करताच सर्वांचे पालन व संहार करतो. ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर हे त्रिगुणात्मक तीन गुणावतार आहेत, पण त्या तिघांच्याही रूपांमध्ये खरोखर मीच असून मीच चराचरांना निर्माण करतो व त्यांचा संहारही करतो. ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टीला उत्पन्न करणारा मीच, विष्णूच्या रूपाने तिचा प्रतिपाळ करणारा मीच आणि रुद्ररूपाने तिचा संहार करणाराही मीच आहे असे समज. बाल्य, तारुण्य व वार्धक्मय या तिन्ही अवस्थांचा कर्ता जसा एकच पुरुष असतो, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिति व प्रळय ह्यांचा आणि गुणकर्माचा कर्ता मीच आहे.
क्रमशः