वाहनांच्या प्रचंड रांगा : खासदार श्रीपाद नाईक यांचे साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी /पणजी
जुने गोवे येथील रेल्वे फाटकामुळे दररोज सकाळी वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात व शेटवच्या वाहनाला फाटकातून बाहेर पडण्यास तब्बल 20 मिनिटे लागतात. याठिकाणी गेली कित्येक वर्षे नागरिक रेल्वे ओव्हरब्रीजची मागणी करीत आहे. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे मात्र हाल होतात.
गवंडाळी येथे पूल झाल्यानंतर संपूर्ण सत्तरी तालुका, सांखळी आणि डिचोली तालुक्याच्या बऱयाचशा भागातून नागरिकांसाठी हा मार्ग तथा येथील पूल हा वरदान ठरलेला आहे. कोविडच्या काळात सार्वजनिक बसेस बंद असल्याने प्रत्येकजण आपापले खासगी वाहन घेऊन पणजीत कामाला येतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. परिणामी कोकण रेल्वेच्या जुने गोवे फाटक बसल्यानंतर वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा लागतात.
कोकण रेल्वे सुरु झाल्यास 24 वर्षे उलटली. भविष्यात गवंडाळी येथे पूल होईल त्यानंतर वाहतूक वाढणार. त्यासाठी आतापासून रेल्वे ओव्हरब्रीज उभारण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत होते. प्रत्यक्षात पूल उभारुन तो वाहतुकीस खुला झाल्यास आता पाच वर्षे उलटली आणि या मार्गावरुन आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. रेल्वे फाटक बंद करुन रेलगाडी गेल्यानंतर वाहनांचा प्रचंड ताफा अलिकडे पलिकडे जातो त्यात किमान 20 मिनिटे वाया जातात. नागरिकांनी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्याकडे अनेक वेळा रेल्वे ओव्हरब्रीज हवा अशी मागणी करुन देखील त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने नागरिक कमालीचे संतापले आहे.
कार्यालयात पोहोचतात उशिरा
सोमवारी करमळी स्थानकावरुन रेल गाडी सुटण्याच्या चक्क 13 मिनिटे अगोदर रेल फाटक लावण्यात आले. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी रेल फाटक लावले आणि रेल गाडी जाऊन वाहन चालकांना फाटकातून बाहेर पडेपर्यंत तब्बल 25 मिनिटे गेली. सकाळच्या प्रहरी सत्तरी, सांखळी, पाळी, वेळगे, सुर्ला, आमोणे, न्हावेली इत्यादी भागातून मोठय़ा प्रमाणात नागरिक पणजीत कामाला येणारे सर्व अडकून बसले व कर्मचारी 15 ते 20 मिनिटे उशिरा कार्यालयात पोहोचले. जुने गोवे रेल फाटकापासून चक्क गवंडाळी पुलापर्यंत वाहनांची रांग लागली. शेकडो चारचाकी वाहने आणि प्रचंड प्रमाणात दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची पार कोंडी झाली. तिथे कधीही वाहतूक पोलीसही नसतो. करमळी स्थानक हे अवघ्या एक किमीच्या परिसरात असून देखील रेलगाडी येण्याच्या 15 मिनिटांपासून फाटक बंद करण्याचे प्रयोजन कळत नाही. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे या प्रकरणाची आतातरी गंभीर दखल घेणार की नाही?