भाजपकडून टीकास्त्र – शेतकरी आंदोलनाचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत ‘डटा है, निडर है, इधर है…भारत भाग्य विधाता!’ असे म्हटले आहे. हा ट्विट करताना राहुल यांच्याकडून एक चूक घडली आहे. निदर्शक शेतकऱयांचे प्रसारित केलेले त्यांनी छायाचित्र प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यातील आहे. पण त्यांनी मुजफ्फरनगरमध्ये रविवारी पार पडलेल्या महापंचायतचा उल्लेख करत हे छायाचित्र प्रसारित केले होते.
राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्यावर शरसंधान केले आहे. राहुल यांनी शेअर केलेले छायाचित्र खूप जुने आहे. राहुल यांना किसान महापंचायतसाठी जुन्या छायाचित्राचा वापर करावा लागत आहे, यातून शेतकरी आंदोलनाच्या नावावर सुरू असलेला दुष्प्रचार यशस्वी होत नसल्याचे स्पष्ट होते असे मालवीय यांनी म्हटले आहे.
तळागाळाच्या स्थितीपासून अनभिज्ञ
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल हे थेट तळागाळात उतरून राजकारण करत नाहीत, पण ट्विटरवर सक्रीय स्वरुपात भ्रमाचे राजकारण करत राहतात. त्यांनी ट्विट करून शेतकरी आंदोलनाच्या जुन्या छायाचित्राला आताचा दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे.
असत्याचे राजकारण
स्वतःच्या पक्षाच्या संघटनेचा विस्तार न करणे, स्वतःच्या संघटनेला अध्यक्षविहिन ठेवणे, परिश्रम न करणे आणि इतरांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून चालविण्याचा प्रयत्न करणे ही राहुल गांधी यांची सवय झाली आहे. देशात जेव्हा कधी भ्रमाचे, असत्याचे राजकारण होते, तेव्हा त्यामागे राहुल गांधींचा हात असतो असे पात्रा यांनी म्हटले आहे.
सोयीस्कर मौन बाळगण्याचा आरोप
राजस्थानच्या जालौर जिल्हय़ात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. देशभरात भ्रमाचे राजकारण करणे आणि काँग्रेसशासित राज्यांच्या विषयांमध्ये मौन बाळगण्याचे कसब राहुल गांधींनी साधले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल याचे वडिल आणि कुटुंबीय जातीयवाद आणि वैमनस्य फैलावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी यांना हे सर्व काही दिसत नसावे अशी खोचक टीका भाजप प्रवक्त्याने केली आहे.