लहानपणी सुट्टय़ा लागल्या की किंवा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा प्रसंगी तरुण मुले अनेक प्रकारचे विक्रम, साहसी कृत्ये करून लक्ष वेधून घेत. ते बघण्यासाठी आम्ही गर्दी करायचो आणि तास न् तास बघत राहायचो. उन्हाळय़ाच्या सुट्टीत कोणी एखाद्या मैदानावर सलग चोवीस, अठ्ठेचाळीस तास सायकल चालवण्याचा विक्रम करून दाखवी. स्वातंत्र्य दिनाच्या सुमारास पावसाळय़ामुळे नद्या दुथडी भरून वाहत असत. शनिवारवाडय़ासमोरील पुलावरून धाडसी तरुण नदीत उडय़ा घेत आणि पोहत पोहत पूर्वेच्या दिशेला जात. थकल्यावर किनारा गाठत. साहस जीवघेणे आणि अंगावर काटा आणणारे होते खरे. या काळात, दिवाळीच्या सुट्टीत किंवा प्रजासत्ताक दिनाच्या आसपास तरुण जादूगार डोळय़ांना पट्टी बांधून दुचाकी चालवण्याचा चमत्कार करीत. हे करतानाच मुलांना आणि तरुणांना बोधपर संदेशदेखील देत. जसे आठवते त्यानुसार जादूगार रघुवीर या प्रकारात वाकबगार होते. पुण्यात हा प्रकार त्यांनीच सुरू केला.
सलग दोन दोन दिवस सायकल चालवणे, पुलावरून नदीत उडी मारणे, डोळे बांधून दुचाकी चालवणे हे क्रीडाप्रकार साहसी आणि खेळाडूच्या चिकाटीचा अंत बघणारे होते. आता इतकी वर्षे लोटल्यावर या खेळाडूंची आठवण येते तेव्हा त्यांचे कौतुक अशासाठी वाटते की या खेळातून त्यांना क्वचित नाममात्र बक्षीस मिळत असे, आप्तेष्टांकडून थोडेसे कौतुक. मात्र कोणाला फार मोठी वृत्तपत्रीय प्रसिद्धी, एखादा भव्य पुरस्कार मिळाल्याचे आठवत नाही. आणि तरीही ही मुले अशी धाडसे करायला प्रवृत्त होत.
हे सगळे लहानपणी पाहिले आहे. आता पहायला मिळेल अशी आशा नाही. कारण आता कितीही पाऊस पडला तरी पुलावरून वाहत्या नदीत उडी मारणारी मुले राहिली नाहीत. नव्या पिढीने साहसाचे नवे प्रकार शोधले असतील. सलग अनेक तास सायकल चालवणारे आता आढळणार तरी कसे, कारण मूठभर व्यायामप्रेमी वगळता सायकलभोवतीचे वलय आता उरले नाही. किशोरवयीन मुलेदेखील गिअर नसलेल्या स्कूटरवरच बसलेली दिसतात.
पण गेल्या आठवडय़ात एक बातमी वाचली आणि आनंद झाला. एका तरुण जादूगाराने डोळे बांधून रहदारीच्या रस्त्यावरून वाहतुकीचा एकही नियम न मोडता दुचाकी चालवली आणि लोकांना संदेश दिला की मी डोळे मिटून गाडी चालवताना नियम मोडले नाहीत, तुम्ही उघडय़ा डोळय़ांनी गाडी चालवताना सगळे नियम पाळा.