महिला-नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
जुने बेळगाव नाका आणि बी. एस. येडियुराप्पा रोडवर दारू दुकाने मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार भांडणे, मारामारी होत आहेत. या परिसरातून महिलांना तसेच लहान मुलांना ये-जा करणे अवघड जात आहे. या ठिकाणी बसथांबा आहे. याचबरोबर काही मंदिरेही आहेत. तेव्हा तातडीने या परिसरातील दारू दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी जुने बेळगाव येथील महिलांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
जुने बेळगावमधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. याचबरोबर या रस्त्यावरून इतर गावातील नागरिकदेखील ये-जा करत असतात. या रस्त्यावरच मारुती मंदिर, गणपती मंदिर आहे. तेव्हा त्या ठिकाणी दारू दुकाने ही त्रासाची ठरत आहेत. शाळकरी मुले याचबरोबर महिलांना या परिसरातून ये-जा करणे कठीण झाले आहे. शेतकऱयांना शेताकडे जाणेही अवघड बनले आहे. तेव्हा तातडीने या परिसरातील दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी होत
आहे.
दारूबरोबरच अमलीपदार्थांची विक्रीदेखील राजरोसपणे सुरू आहे. शेतामध्ये काही जण जाऊन दारूच्या बाटल्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्या फेकून देत आहेत. तर काही मद्यपी दारूच्या बाटल्या फोडत आहेत. गांजाचेदेखील सेवन करत आहेत. मद्य तसेच अमलीपदार्थांचे सेवन करून महिला तसेच मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. तेव्हा ती दुकाने बंद करावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सोहन खन्नुकर, जितेंद्र चौगुले, प्रवीण देसूरकर, संतोष शिवणगेकर, लक्ष्मीकांत सुतार, सुमित रेडेकर, सतीश खन्नुकर, विक्रम होसूरकर, संदीप पाटील, अमित देसूरकर, महेश पाटील यांच्यासह इतर तरुण व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.