नागरिकांना असुविधांचा फटका : उतारे काढायला येणाऱयांची गैरसोय : दुरुस्ती-स्वच्छतेकडे दुर्लक्ष : तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कचेरी गल्ली येथील जुन्या तहसीलदार कार्यालयाची देखभाल व स्वच्छतेअभावी दुर्दशा झालेली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवून स्वच्छता केली जाते. दुसरीकडे मात्र तहसीलदार कार्यालयाची इमारत अस्वच्छतेच्या कचाटय़ात सापडली आहे. त्यामुळे प्रशासकीय कागदपत्रांसाठी कार्यालयात येणाऱया सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.
बेळगाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालयात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, पेन्शन, सातबारा उतारा, नॉन क्रिमिलेअर, जनसंख्या प्रमाणपत्र, मरण उतारा, जन्म दाखला आदी कागदपत्रे मिळत असतात. यासाठी कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची सतत गर्दी असते. मात्र, कार्यालयात असुविधांचा फटका नागरिकांना बसत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य
इमारतीतील कामकाजाच्या खोल्या वगळता इतरत्र कचरा व अस्वच्छता पसरली आहे. त्याचबरोबर कार्यालयालगत असलेल्या शौचालयाच्या आवारात कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेजारी असलेल्या शौचालयाची दुर्दशा झाल्याने काही नागरिक उघडय़ावरच मलमूत्र करत आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना नाक मुठीत धरून कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. इतकी बिकट परिस्थिती असतानाही संबंधितांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
कांही खोल्या भंगाराने भरलेल्या
या कार्यालयात उतारा केंद्र, नाडा कचेरी, भू-अर्ज विभाग आदी कार्यालये आहेत. यातील उतारा केंद्रातून पीक कर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बी-बियाणे, खते वाटप, जमीन खरेदी-विक्री, शासनाच्या शेतीसंबंधी योजना आदी कारणांसाठी सातबारा दिला जातो. त्यामुळे शेतकऱयांची नेहमी ये-जा असते. मात्र, या ठिकाणी येणाऱया नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयातील शौचालयाची दुर्दशा झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष करून महिलांची शौचालयाअभावी कुचंबणा होताना दिसत आहे. इमारतीतील काही खोल्या वापराविना पडून असल्याने भंगाराच्या साहित्याने भरल्या आहेत. या खोल्यांतूनही अस्वच्छता पसरली आहे.
राष्ट्रीयस्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार ‘स्वच्छ भारत… समृद्ध भारत’ या विचारांना चालना मिळत आहे. मात्र, प्रशासकीय कार्यालयाच्या स्वच्छतेकडे कानाडोळा होत असल्याने तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळत आहे. कार्यालयाची स्वच्छता करून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.