डांबरीकरण उखडले, पट्टय़ा निखळल्या तरी दुर्लक्षच
प्रतिनिधी/ बेळगाव
जुन्या धारवाड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. उड्डाणपुलावर बऱयाच ठिकाणी डांबरीकरण उखडले असल्याने खड्डे पडले आहेत. तर गर्डर जोडण्यासाठी बसविण्यात आलेल्या पट्टय़ा निखळल्या असून, त्यांचा मोठा आवाज होत आहे. उड्डाणपुलाची अवस्था दयनीय झाली आहे. प्रशासनाचा दुर्लक्षपणा वाहन चालकांच्या जीवावर उठला आहे.
शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबवून ती जुन्या धारवाड रोडमार्गे वळविण्यासाठी जिजामाता चौकपासून रूपाली थिएटरपर्यंत ओव्हरब्रिज उभारण्यात आला. परंतु उड्डाणपूल उभारल्यापासून डागडुजीकडे ना कंत्राटदाराने लक्ष दिले ना रेल्वे विभागाने. महानगरपालिका, स्मार्ट सिटी, रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे उड्डाणपुलावर व उड्डाणपुलाच्या खाली कचऱयाचे ढीग दिसून येतात.
जिजामाता चौकातून अवजड वाहने या उड्डाणपुलाकडे जातात, परंतु जोडण्यात आलेल्या गर्डरच्या पट्टय़ा सुटून वर आल्यामुळे वाहने अडकत आहेत. काही ठिकाणी डांबर उखडला असून रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. वाहनधारकांना खड्डे चुकवून वाहने चालवावी लागत आहेत. रात्रीच्यावेळी या खड्डय़ांमध्ये दुचाकीचे अपघातही होत आहेत.
पट्टय़ांच्या आवाजाने नागरिक हैराण
गर्डर जोडण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पट्टय़ा सुटून बाहेर पडल्या आहेत. वाहने या पट्टय़ांवरून गेल्यानंतर मोठा आवाज होत आहे. रोजच्या या आवाजाने आसपासचे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या पट्टय़ा काढाव्यात अन्यथा त्यांना वेल्डिंग तरी करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.