खरीप हंगामात खत खरेदीसाठी सोसायटय़ांना देणार कॅशक्रेडिट : आंबा, काजू जीआय नेंदणीसाठी देणार अनुदान : जिल्हा बँक अध्यक्ष सतेश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / देवगड:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांना खरीप हंगामात खतांची अडचण भासू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटय़ांना खत खरेदीसाठी कॅश क्रेडिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. आंबा व काजू उत्पादकांना ‘जीआय’ नोंदणी फीसाठी शासनाच्या सिंधुरत्न योजनेतून अनुदान देण्यात येईल. जुलै अखेरपर्यंत हापुस आंबा विक्रीसाठी मार्केटिंग मॉडेल तयार करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी देवगड येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ऍड. अविनाश माणगावकर, देवगड तालुका खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष जयदेव कदम, मुनाफ ठाकुर आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे येणाऱया खरीप हंगामामध्ये शेतकऱयांना अनुदानीत खतांचा तुडवडा भासू नये, यासाठी जिल्हा बँक सर्वोतोपरी काळजी घेत आहे. तालुका खरेदीविक्री संघाकडे खताची उपलब्धता व्हावी, यासाठी तालुका खरेदी विक्री संघाला देखील कॅशक्रेडिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एप्रिलपासूनच बँकेने सर्व सहकारी विकास सोसायटींशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.
आंबा व काजूच्या जीआय नोंदणी फीसाटी अनुदान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांची मार्केटिंगसाठी झालेली अडचण लक्षात घेऊन लहान व मोठे आंबा बागायतदारांना एकत्र घेऊन जुलै महिन्यापर्यंत हापुस आंब्यासाठी मार्केटिंग मॉडेल तयार करणार आहे. हापुस आंब्याला व काजूला जीआय नामांकन मिळालेले असल्याने आंबा व काजू बागायतदारांनी जीआयची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बँक पुढाकार घेऊन शासनाच्या सिंधुरत्न योजनेतून जीआय नोंदणी फीसाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे. यासाठी शासनस्तरावर यशस्वी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
काजू 110 रुपयांच्या खाली विकू नका
कोरोनामुळे मार्केट उपलब्ध नसल्यामुळे काजू व्यावसायिक कमी दरात काजू विक्री करीत आहेत. मात्र, काजू उत्पादकांनी असे करू नये. स्वत:चे नुकसान करून काजू कमी दरात विक्री करू नये. लॉकडाऊन उठेपर्यंत काजू कमी दरात विक्री करू नका. जिल्हा बँक तुम्हांला 20 टक्के जादा काजू पीक कर्ज उपलब्ध करून देईल. काजू उत्पादकांना जिल्हा बँक कॅश क्रेडिटही उपलब्ध करून देईल, असेही ते म्हणाले. दोडामार्गमध्ये सध्या 120 रुपये दराने काजू विक्री सुरू झाली आहे त्यामुळे काजू व्यावसायिकांनी कमी दरात काजू विकू नये, असेही ते म्हणाले.
महसूल विभागाची पडेल, मिठबाव व देवगड येथील हवामान केंद्र बंद असल्यामुळे येथील शेतकऱयांना गेल्यावर्षी पिकविम्याची 28 कोटी रक्कम मिळू न शकल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.