प्रतिनिधी / सातारा :
जुलै महिना सुरू असून दरवर्षी या महिन्यात पावसाची संततधार सुरू असते. चालु वर्षी मात्र जुलै महिना सुरू असून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्याचे लक्ष पावसाने वेधले आहे. तसेच तापमानात कमालीचा बदल झाला असून, पारा 34 अंशावर पोहचत आहे.
यावर्षी उन्हाळयात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाडा कमी जाणवला. तोच मान्सूनला वेळेवर सुरूवात झाली. यामुळे यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, ऐन जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन यामुळे पावसांची नुसतीच प्रतिक्षा करावी लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर तापमानात वाढ होत आहे. पारा 34 अशांवर पोहचत आहे. रात्रीच्या वेळी पंखे सुरू करून झोपण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यांचा परिणाम पिकांवरही झाला आहे. सततच्या हवामान बदलाने सर्दी, तापसारखे आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा काळात आरोग्याची काळजी घ्यावी. असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
साताऱ्यातील कमाल तापमान
दि. 25 जून कमाल तापमान 27.03 अंश, 26 जून कमाल तापमान 30 अंश, 27 जून कमाल तापमान 26.02 अंश, 28 जून कमाल तापमान 31.04 अंश तर 29 जून कमाल तापमान 31.06 अंश आणि 30 जूनला 30.08 अंश होते. 1 जुलैला 29.09, 2 जुलैला 29.08, 3 जुलैला 31.05, 4 जुलै 32.04, 5 जुलै 32.04, 6 जुलै 32.01, 7 जुलै 32.02, 8 जुलै 30.05, आणि 9 जुलै 27.06 अंश तापमान होते.