पद्मकुमार माधवन नायर होऊ शकतात पहिले सीईओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँका आणि वित्तीय संस्थांचे बॅड लोन म्हणजेच बुडित कर्जांच्या समस्येवर तोडग्यासाठी प्रस्तावित नॅशनल असेट रीकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल) म्हणजेच बॅड बँकेसाठी नव्या सीईओची निवड जवळपास अंतिम झाली आहे. सूत्रांनुसार केंद्र सरकार पद्मकुमार मंगलम नायर यांना नवी जबाबदारी देऊ शकते. पद्मकुमार सध्या एसबीआयमध्ये स्ट्रेस्ड असेट्सचे मुख्य महाव्यवस्थापक आहेत.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये पद्मकुमार दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. त्यांना बॅड लोनशी संबंधित कार्यांचा दीर्घ अनुभव आहे. या नियुक्तीमुळे जूनपासून बॅड बँक सुरू केली जाणार असल्याची अपेक्षा आहे. नॅशनल असेट री-कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड किंवा बॅड बॅक जूनपासून सुरू होणार असल्याचे इंडियन बँक्स असोसिएशनचे सीईओ सुनील मेहता यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
एसबीआयच्या गुणवत्तेवर विश्वास
येस बँकेची स्थिती बिघडली असता एसबीआयचे मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांना रिकन्स्ट्रक्टेड बँकेचे प्रमुख करण्यात आले होते. यापूर्वी स्टेट बँकेचे संजीव चड्ढा यांना बँक ऑफ बडोदा आणि पद्मजा चुंदुरु यांना इंडियन बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 10 सरकारी बँकांच्या विलिनीकरणातही सरकारने एसबीआय अधिकाऱयांवरच विश्वास दर्शविला आहे.
अर्थसंकल्पात घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना बॅड बँकेची घोषणा केली होती. बँकांची अडकून पडलेली कर्जे किंवा मालमत्तांचे टेकओव्हर करणे किंवा याप्रकरणी तोडगा काढणाऱया आर्थिक संस्थेला बॅड बँक म्हटले जाते. बॅड बँकेच्या स्थापनेत सरकारी तसेच खासगी बँकांची भागीदारी राहणार आहे.
प्रोजेक्ट सशक्त
2018 मध्ये सरकारी बँकांच्या एनपीएच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्रोजेक्ट सशक्तची घोषणा करण्यात आली होती. यात सरकारी बँकांच्या बॅड लोन री-कंस्ट्रक्शनसाठी पाच सूत्री योजना तयार करण्यात आली होती. यंदा बॅड बँकेच्या माध्यमातून स्ट्रेस्ड असेट्सची कमी किमतीत गुंतवणुकदारांमध्ये विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदार कर्जदारांकडून वसुली करणार आहेत. भारतीय बँकांच्या एकूण कर्जांच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण 8 टक्के आहे.
बॅड बँकेचे स्वरुप
बॅड बँक सामान्य बँकांप्रमाणे काम करत नाही. म्हणजेच पैसे जमा करणे, खाते उघडणे किंवा कर्जवाटपाचे काम करत नाही. याचमुळे सर्वसामान्य नागरिक या बँकेसोबत देवाणघेवाण करू शकणार नाहीत. ही बँक कंपनीप्रमाणे काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवींशी या बँकेचा कुठलाच संबंध नसणार आहे.