कानपूर / वृत्तसंस्था
देशातील ओमिक्रॉन विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट संपल्यानंतर आता चौथ्या लाटेचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाबाबत दोनदा अचूक दावे करणाऱया आयआयटी-कानपूरने चौथ्या लाटेच्या आगमनाची तारीख दिली आहे. नव्या अंदाजानुसार 22 जूनपासून देशात चौथी लाट सुरू होऊ शकते.
जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेली कोरोनाची चौथी लाट 23 ऑगस्टपर्यंत शिखरावर पोहोचेल आणि किमान ऑक्टोबरपर्यंत टिकेल, असा अंदाज कानपूर-आयआयटीमधील तज्ञांनी व्यक्त केला आहे. जगभरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आतापर्यंतच्या कोरोना संसर्गाचा अभ्यास करून हा अंदाज बांधण्यात आला आहे. यापूर्वी आयआयटी कानपूरचा देशातील तिसऱया लाटेबाबतचा अंदाजही योग्य ठरला होता.
देशात दिवसभरात 7,554 नवे रुग्ण
सध्या देशात कोरोना संसर्गात घट होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 7 हजार 554 नवीन रुग्ण आढळले असून 223 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत 10 हजारांखाली नवे बाधित सापडत आहेत. नव्या रुग्णांपेक्षा संसर्गमुक्त होणाऱयांचा आकडा अधिक असल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये झपाटय़ाने घट होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात 14 हजार 123 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 85 हजार 680 इतकी कमी झाली आहे. तर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱयांची संख्या 5 लाख 14 हजार 246 झाली आहे. आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 38 हजार 599 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 4 कोटी 23 लाख 38 हजार 673 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत जवळपास 178 कोटी डोस प्राप्त
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 178 कोटी डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 20 लाखांहून अधिक लसींचे डोस देण्यात आल्यामुळे आतापर्यंत 177 कोटी 91 लाख 48 हजार 811 डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केली.