दिल्ली क्राईम ब्रँच व बिहार पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘आसामला मदत करायची असेल तर आसाम भारतापासून वेगळे केले पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारा जेएनयुचा विद्यार्थी शरजील इमाम याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करत जहानाबाद येथून त्याला ताब्यात घेतले आहे. अलीगढमध्ये त्याने भाषणादरम्यान हे वक्तव्य केले होते.
शाहीनबाग येथे आयोजित निदर्शनांमागे शरजीलचा मुख्य सहभाग असून प्रक्षोभक भाषणावरुन त्याच्याविरोधात दिल्ली, आसामसह बिहार, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर बिहारमध्ये कारवाई करुन त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी दिल्ली पोलिसांनी शरजीलच्या भावालाही ताब्यात घेतले आहे.
विविध कारणांमुळे अलीकडे सातत्याने चर्चेत असणाऱया जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा शरजील हा विद्यार्थी आहे. जेएनयुच्या इतिहास अभ्यास केंद्रामध्ये पी. एचडीचा तो अभ्यास करत आहे. नागरिकता संशोधन कायद्याविरोधात निदर्शने करत असताना अलिगढ येथील एका आंदोलनात त्याने आसाम भारतापासून वेगळे करायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचबरोबर भडक वक्तव्ये केल्याने तो चर्चेत आला होता. शरजीलने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसाम भारतापासून तोडण्यासह मुस्लिमांनी देशभर यासाठी चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहनही केले होते.
जहानाबाद येथे अखेर अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहानाबाद पोलिसांनी शरजीलला दंडाधिकाऱयांसमोर हजर केले. त्याला ट्रांजिट रिमांड देण्यात आली असून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. क्राइम ब्रँचचे उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत शरजीलला जहानाबाद येथे छापा टाकून अटक करण्यात आली आहे. मूळ बिहारचाच असलेल्या शरजीलला पत्ता लावण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. दिल्लीसह मुंबई आणि बिहारमधील पाटण्यातही छापे टाकण्यात आले होते. तथापि तो सापडला नव्हता. बिहारमधून तो नेपाळला पळून गेला असता तर त्याला परत आणणे अवघड झाले असते, असे ते म्हणाले. तर तो स्वतःहून पोलिसांत हजर झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.
राष्ट्रविरोधी वक्तव्ये नकोतच : मुख्यमंत्री नितीशकुमार
दरम्यान, या कारवाईनंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही राष्ट्रविरोधी वक्तव्ये करण्याची गरज नाही. राष्ट्राच्या हिताविरोधात जाणाऱयांवर कारवाई केली जाऊ शकते. त्याच्यावरील आरोप आणि अटकेच्या कारवाईबाबत न्यायालयच योग्य ते निर्णय घेईल, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे या कारवाईचे समर्थन केले आहे.
इमाम कुटुंब संजदशी संबंधित
शरजील याचे दिवंगत वडिल जदयुचे स्थानिक नेते होते. तसेच एकवेळा विधानसभा निवडणूकही लढवली होती. यामध्ये त्यांना यश आले नसले तरी ते राजकारणात सक्रीय होते. त्याचे वडिलच नव्हेतर लहान भाऊ मुजम्मिल हाही राजकारणातच सक्रीय आहे. राजकारणात उतरण्यासाठी त्याने सहा महिन्यांपूर्वी जेएनयुमधील शिक्षण सोडून दिले होते.
जेएनयुचीही नोटीस
शरजीलच्या या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल जेएनयुच्या शिस्त पालन समिनीनेही घेतली होती. कमिटीने त्याच्याविरोधात नोटीसही काढली आहे. त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत हजर होण्याचे आणि प्रक्षोभक भाषणाविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
भावासह मित्राला अटक
शरजीलला अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाईला वेग दिला. मंगळवारी पहाटे चार वाजता केंद्रीय तपास संस्थेच्या एका पथकाने काको येथील मल्लिक टोलामधील शरजीलला घरामध्ये पुन्हा तपासणी केली. त्याचा लहान भाऊ मुजम्मिल, मित्र मोहम्मद इमरान यांना ताब्यात घेतल्याचे देव यांनी सांगितले.
सहकार्य करण्याचे शरजीलच्या काकाचे वक्तव्य
शनिवारी सायंकाळी तो बिहारमधील फुलवारी शरीफ येथे एका बैठकीमध्ये सहभागी झाल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. त्यानंतर बिहारमध्येही शोध मोहिम राबवण्यात येत होती. सोमवारी शरजीलचा काका अर्शद इमान यांनी याप्रकरणी आपण कायद्याचा आदर राखून सर्व सहकार्य करु. यातील वास्तव लवकरच उघड होईल असे म्हटले होते. तर त्याच्या आई अफसान यांनी शरजील निर्दोष असल्याचे म्हटले होते. तसेच न्यायालयासमोर त्याचे निर्दोषत्व सिद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.