मौजेदापोली/ वार्ताहर
सध्या समुद्रात जेलीफिशचा वावर वाढल्यामुळे मासेमारी करताना मच्छीमारांना मोठय़ा त्रासाला समोर जावे लागत आहे. यामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. 2018 पासून शासनाने डिझेल परतावा न दिल्याने आणि पुरेशा प्रमाणात मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे.
जेलीफिश हा मासा सामान्यतः खोल समुद्रात रहातो. परंतु अलिकडे समुद्रात होणारे बदल, वादळे आदी नैसर्गिक बदलांमुळे जेलीफिश किनाऱयाजवळ आले आहेत. मासेमारीसाठी फेकलेल्या जाळय़ात ते सापडत आहेत. हे मासे खूप वजनदार असतात. यामुळे जाळय़ात सापडल्यानंतर जाळे बाहेर काढताना त्रास होते. जेलीफिशना हात लावल्यानंतर तो अंगाला लागल्यास खाज सुटते. हा मासा पाण्याबाहेर बराच काळ जिवंत राहतो. त्यामुळे जाळ्यात सापडलेले जेलीफिश पुन्हा समुद्रात टाकले जातात. हे मासे जाळय़ाजवळ असल्यानंतर इतर मासेही जवळ येत नसल्यामुळे मच्छीमारांना मासे कमी प्राप्त होत आहेत. त्यामुळे मासेमारीचा हंगाम सुरू झाला असला तरी मच्छीमारांना मासळीची वाट पहात बसावे लागते. यातून दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे.
मच्छीमारांना अद्याप शासनाकडून डिझेल परतावा मिळालेला नाही. मासेमारी चांगल्या प्रकारे झाली नाही तर मच्छीमारांनी जगायचे कसे, कामगारांना पगार कसा द्यायचा असे अनेक प्रश्न मच्छीमारांसमोर उभे आहेत. त्यात आता जेलीफिशमुळे परिस्थिती आणखी अवघड झाल्याचे दापोलीतील मच्छीमारांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कोळंबी चांगल्या प्रमाणात मिळत होती. परंतु सध्या कोळंबीतही घट झाल्याचे हर्णै येथील मच्छीमारांनी सांगितले.