नवीन आंग्ल वर्षाची सुरुवात झालेली आहे. आपले भारतीय संस्कृतीचे नव वर्ष हे पाडव्यापासून सुरु होत असले तरीही सर्व परंपरांचा आदर आणि स्वीकार ही वृत्ती असल्याने आपण आंग्ल नववर्षाचे स्वागत नेहमीच करत असतो. आपली संस्कृती ही सनातन संस्कृती आहे असे आपण मानतो आणि जगानेही हे मान्य केले आहे. जे नित्य-नूतन नवीन आहे ते म्हणजे सनातन असा सनातन ह्या शब्दाचा अर्थ आहे. आजकाल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ज्याला ल्ज्datा किंवा अद्ययावत अथवा आधुनिकीकरण करणे असे म्हणतात त्यालाच आपण सनातन असे म्हणू शकतो. सनातन ह्या शब्दाचा मागील काही शतकांमध्ये अनेक ठिकाणी अपभ्रंश आणि अर्थाचा अनर्थ केला गेला आहे. पण सनातन ह्या संज्ञेनुसार हा अपभ्रंश किंवा अर्थाचा अनर्थ करणेही स्वीकारले गेले आहे. ह्या सृष्टीतील प्रत्येकाला काहीतरी कालमर्यादा आहेत. एखाद्या क्रियेची सुरुवात आणि त्या क्रियेची समाप्ती ही ठरलेली आहे. जिथे समाप्ती होते तेथूनच नवीन सुरुवात होत असते. आरंभ आणि शेवट हे चक्र सातत्याने सुरु राहणे म्हणजेच नित्य-नूतन घडत राहणे होय! ‘जुनं ते सोनं आणि नाविन्य ते असणं’ म्हणजेच सनातन होणे होय!
अद्ययावत किंवा आधुनिक होणे हे जरी गरजेचे असले तरीही त्यास दिशा देणारे आणि ह्या प्रक्रियेच्या मुळाशी पोचणारे तत्त्वज्ञान हे संत साहित्यातून आपल्याला जाणवते. श्रीसमर्थांचा दासबोध ह्याचे उत्तम उदाहरण आहे. कारण, ग्रंथराज दासबोधात कुठून सुरुवात करावी आणि कुठे थांबावे हे अतिशय प्रभावी पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा प्रत्येक उपक्रमाची सुरुवात कशी असावी आणि कुठे थांबावे ह्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. औद्योगिक समूहातील एखादा उपक्रम हा वर्षानुवर्षे ठरवलेल्या नियोजनानुसार आणि अवलंबिलेल्या पद्धतीनुसार सुरू असेल तर एका विशिष्ट कालावधीनंतर त्यात सहभागी असणारे कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि स्वतः त्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा यांच्यात एकसुरीपणा वाढायला लागतो. ह्याच एकसुरीपणातून वैचारिक अस्थिरता निर्माण होते आणि काही वर्षांनी अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न सोडवण्यात खूप मोठी ऊर्जा आणि वेळ हा संपूर्ण उद्योग समूहाला द्यावा लागतो. तेवढय़ाच वेळात इतर स्पर्धक उद्योग समूह बाजारपेठेत जम बसवतात आणि त्यामुळे नैराश्यही वाढू शकते.ज्या उद्योग समूहात कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि संस्थापकांचे संज्ञापन उत्तम आणि पारदर्शी असते तेथे नैराश्य निर्माण होत नाही. कोणत्याही उद्योग समूहाची उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी अनेक व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह एकत्र आलेले असतात. उद्योग समूहातील सर्वच घटकांमध्ये प्रभावी समन्वय आणि एकत्रीकरण असल्याशिवाय उद्दिष्टय़े साध्य होत नाहीत. अनेक लोक ज्या ठिकाणी एकत्रितरीत्या कामे करतात तेथे त्यांचा एकमेकांशी संबंध येतोच. त्यांचे कामकाज आणि आपापसातील संबंध प्रभावीपणे होण्यासाठी संदेशवहनाची आवश्यकता असते. व्यवस्थापनशास्त्रांत प्रत्येक गोष्ट ही संदेशवहनावर आधारित आहे. जे चांगले व्यवस्थापक असतात ते त्यांचा 70 ते 75 टक्के वेळ योग्य संज्ञापनाकरिता खर्ची घालतात. ह्यामुळेच इतरांकडून कामे करवून घेणे त्यांना शक्मय होते. उत्तम उद्योजक किंवा व्यवस्थापक व्हायचे असल्यास त्यांनी श्रीसमर्थांनी जाणपण निरुपण समासात सांगितल्याप्रमाणे वागावे. त्यात श्रीसमर्थ असे सांगतात की,
विद्या नाहीं बुद्धी नाहीं !विवेक नाहीं साक्षेप नाहीं !कुशळता नाहीं व्याप नाहीं !म्हनौन प्राणी करंटा !!इतुकें हि जेथें वसे !तेथें वैभवास उणें नसे !वैभव सांडितां अपैसें !पाठी लागे !! 10-11/04/09
म्हणजे, मनुष्य करंटा बनतो जर त्याच्या अंगी विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न आणि व्याप नसेल तर. परंतु, हे सगळे गुण ज्याच्या अंगी आहेत त्याच्या वैभवाला कमी पडत नाही त्याने कितीही नाही म्हंटले तरीही वैभव त्याच्या मागे धावते.ज्या उद्योगसमूहाला स्वतःचा व्याप वाढवायचा असेल त्या उद्योग समूहात ज्ञानी, हुशार, विवेकी, प्रयत्नवादी आणि चांगले कौशल्य अंगी असणारे कर्मचारी आवश्यक आहेत. असे सर्वोत्तम कर्मचारी निवडणाऱया उद्योग समूहाने कितीही नाही म्हटले तरीही ते वैभवसंपन्न होत राहतात. हे सगळे गुण आत्मसात करायचे असतील तर सातत्याने परिश्रम करणे गरजेचे असते. ज्या उद्योग समूहातील संज्ञापन उत्तम आहे तेथे परिश्रम करणारे कर्मचारी असतात आणि ते संबंधित उद्योग समूहाचे वैभव दिवसेंदिवस वाढवत असतात. याच समासात कोणाला किती आणि कसे वैभव मिळते हे पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
जैसी विद्या तैसी हावं !जैसा व्याप तैसें वैभव !
तोलासारिखा हावभाव ! लोक करिती ! 13/04/09
म्हणजे, जेवढी माणसाची विद्या असते तेवढी त्यास हाव म्हणजे महत्त्वाकांक्षा असते. मनुष्यप्राण्याचा जितका व्याप असतो तितके त्यास वैभव मिळते. तसेच जेवढे माणसाचे सामर्थ्य असते तितका तो कर्तबगार असतो. कुठल्याही व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने सर्व गोळा बेरीज करणे म्हणजे संज्ञापन होय! संदेशवहन प्रक्रिया ही सांगण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची आहे. अधिकाधिक व्यक्तींमध्ये माहिती, कल्पना, मते, भावना किंवा संवेदनांची आदान-प्रदान करणे म्हणजे संज्ञापन असे म्हणता येईल. संदेशवहनात पत्र, माहिती किंवा सूचना यांची देवाण-घेवाण केली जाते. संज्ञापनात एका समूहाकडून दुसऱया समूहाकडे माहिती किंवा सूचना पाठवल्या जातात.
विद्या, हुशारी, व्याप, कर्तबगारी आणि वैभवसंपन्न ज्या औद्योगिक समूहांना व्हायचे असेल तेथील कामगार वर्गापासून ते संस्थापक आणि संचालक मंडळापर्यंत सर्वोत्तम दर्जाचे संज्ञापन ठेवावे. संदेशवहन आणि संज्ञापन ह्या प्रक्रियेत सातत्याने बदल घडवणे आणि त्याद्वारे अद्ययावत होणे म्हणजेच सनातन वृत्तीचा स्वीकार करणे होय! जे औद्योगिक समूह स्वतःच्या नियोजनात आणि कार्यपद्धतीत अशाप्रकारे नित्य-नूतन बदल करत असतात तेच सर्वकाळ सदैव सनातन असतात.
माधव किल्लेदार