रात्री उशिरा ऑफिसवरून घरी आले की थकला भागला जीव कधी एकदा जेवतोय आणि पाठ टेकतोय असाच विचार करतो. साहाजिकही आहे. सकाळी वेळेत ऑफिसलाही पोहोचायचे असते. रहाटगाडगे सुरूच असते. परंतू जेवल्या जेवल्या झोपणे हे आरोग्यासाठी घातक आहे. दुपारीही जेवण करून झोपणे आरोग्याच्या दृष्टीने अहितकारकच आहे. जेवणे आणि झोपणे यांबाबत आरोग्यशास्र नेमके काय सांगते?
- जेवल्या जेवल्या झोपल्यास अन्नपचनास त्रास होतो.
त्यामुळे पोटात तसेच राहिलेल्या अन्नाचे रूपांतर चरबीमध्ये होते. परिणामी वजन हळुहळु वाढते. पोटात अन्न साठल्याने अन्नाचे पचनही हळूहळू होते. त्यामुळे शरीराची चयापचय क्रियाही कमजोर होते. - जेवण पचण्यासाठी आतडय़ांमध्ये आम्ल तयार होते. परंतू जेवल्यानंतर लगेच झोपल्यास
अन्नपचनासाठीचे हे आम्ल पोटातून निघून अन्ननलिकेत येते,
फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. परिणामी व्यक्तीला पोटामध्ये जळजळ होणे आणि पित्त होणे आदी समस्या भेडसावतात. - जेवल्यानंतर लगेचच आडवे झाल्याने पोट जड होते. झोपही शांत लागत नाही. जरी झोप लागली तरीही पोटाच्या जडत्वामुळे झोप शांत न लागता मध्ये मध्ये मोडते. नियमितपणे झोपेत असा खंड पडत राहिल्यास झोपेच्या समस्या भेडसावतात.
- जेवल्यानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते, परंतु जेवल्यानंतर लगेच झोपल्यास त्या रक्तशर्करेचा वापर शरीर करू शकत नाही. मग रक्तामध्ये जास्त प्रमाणात शर्करा मिसलळी जाते. या प्रक्रियेमुळे व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका खूप अधिक वाढतो.
- त्यासाठी जेवल्या जेवल्या आडवे होणे, झोपणे टाळावे. आरोग्यशास्रानुसार रात्रीच्या झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करावे. जेवल्यानंतर शतपावली करावी. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि स्थूलपणालाही आमंत्रण मिळत नाही.