महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात –
तिये समयीं जनार्दन । कोण्हा कांहीं न वदे ।
धरूनि ठेला महामौन । काय म्हणून तें ऐका ।
सखा मेहुणा रुक्मि मेला । असतां कृष्ण न बोले बोला । हृदयीं पूर्ण विचार केला । म्हणोनि राहिला मौनस्थ । मागें सरों जातां आड । पुढें होतां विहीर अवघड । दोहीं प्रकारें सांकड । न मोडे भीड दोघांचीही । मेहुण्यासाठीं मानितां विषम । बळरामाचें भंगेल प्रेम । रुक्मि निंदक म्हणतां अधम। भीमकी विराम पावेल । भीमकीबळरामाचें मन । दुखवेल म्हणोनि धरिलें मौन । तैसाचिं न वदे पैं प्रद्युम्न । वनिताजननीरामभिडे । दोहींकडे भंगेल स्नेहे । यालागीं कांहीं बोलतां न ये । यानें सज्जूनियां लवलाहें । द्वारावतिये चालिले ।
परीक्षिता ! श्रीकृष्णांनी विचार केला की, बलरामांची प्रशंसा केली तर रुक्मिणी रागावेल आणि हे वाईट केले, असे म्हटले तर बलराम रागावेल. म्हणून आपला मेहुणा रुक्मी याच्या मृत्युबद्दल ते चांगले अगर वाईट काहीच बोलले नाहीत. प्रद्युम्नानेही असाच विचार केला. रुक्मीची कन्या ही त्याची पत्नी होती. तिला आपल्या बापाला बलरामाने मारले, याचे दु:ख होणारच. बलराम काकांना दुखावणेही प्रद्युम्नाला योग्य वाटेना. त्यामुळे तोही गप्प राहिला.
रति रेवती रुक्मवती । रुक्मिणी सहित बैसल्या रथीं। नवी नोवरी रोचना सती । बैसे स्वपतिसह यानीं ।
दिव्य रहंवर रत्नखचित । लोलपताकाकलशयुक्त ।
अनिरुद्ध आरूढे रोचनेसहित । वोहर मिरवत यदुभारिं । उद्धव अक्रूर चारुदेष्ण । साम्बप्रमुख कृष्णनंदन । द्वारके चालिले तें व्याख्यान । ऐकें संपूर्ण कुरुवर्या । नवी नोवरी रोचना सती । अनिरुद्धेंसीं दिव्य रथीं । वाहूनि कुशस्थाळी प्रति। तदनंतरें चालिले । रामप्रमुख यादवभार । वृष्णि अंधक दाशार्ह कुकुर । भोजकटपुरीहूनि सत्वर। सहपरिवार निघाले । धराभार उतरावया । जे अवतरले अमरकार्या । धर्म स्थापूनि दुरात्मया। वधावया उद्युक्त । ते येथ साधले सकळार्थ । सिद्धी गेलें विवाहकृत्य । रुक्मिप्रमुख राजे दृप्त । खेळतां द्यूत निर्दाळिले । दुर्मदांचे गळाले मद । राजे पळाले होवोनि विमद । कृष्णाश्रयें यादववृंद । करिती आनंद विजयाचा । मधुदैत्याचें सूदन । कर्ता म्हणोनि मधुसूदन ।
त्याच्या आश्रयें सुपर्वाण । ते येथ यदुगण हरि पाळी ।
ऐसे यादव आह्लादभरित । वधूवरेंसीं विराजित ।
रामकृष्णप्रमुख समस्त । क्रमिती पंथ द्वारकेचा ।
यानंतर अनिरुद्धाचा विवाह आणि शत्रूचा वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंतांचे आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहिता रोचना तिच्यासह अनिरुद्धाला श्रे÷ रथात बसवून भोजकट नगरातून द्वारकापुरीला निघून आले.
पुढें पातलें द्वारकापुरा । आला श्वफल्क सामोरा ।
वसुदेवाच्या समस्त कुमरा । यादवभारासमवेत ।
परस्परें झाल्या भेटी । नगरिं प्रवेशतां जगजेठी ।
बळि सांडूनि उठाउठी । कनकमुष्टि वांटिलिया ।
रोचना अनिरुद्ध वधूवरें । नृपा भेटी नेलीं गजरें ।
उग्रसेनें स्पर्शोनि करें । कनकाम्बरें गौरविलीं ।
Ad. देवदत्त परुळेकर