प्रतिनिधी/ चिपळूण
शंभर टक्के वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जे. के. तालाबोट कंपनीतील 226 कामगारांनी पुकारलेला संप बुधवारी सहाव्या दिवशीही सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान कंपनीने चार कामगारांना निलंबनाची नोटीस बजावल्याने नवा तिढा निर्माण झाला आहे.
कोरोना लॉकडाऊनचा फटका गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जे. के. तालाबोट कंपनीलाही सुरूवातीला बसला. औद्योगिक विकास महामंडळाकडून उत्पादनास परवानगी मिळाल्यानंतर 27 एप्रिलपासून कंपनीने हळूहळू उत्पादन सुरू पेले. मात्र 8 मेनंतर कंपनीने पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के उत्पादन सुरू केले. मात्र उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीने कामगारांना मार्च 2021 पर्यंत 50 टक्केच वेतन देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर कामगारांमध्ये असंतोष पसरला. शंभर टक्के उत्पादन कंपनी आमच्याकडून घेत असताना 50 टक्केच वेतन का, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला. शिवाय कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर कापण्यात येत असलेले 50 टक्के वेतन देण्याबाबत कंपनी कोणतेचे ठोस आश्वासन देत नाही. उलट वेतन कापण्याच्या विषयावर तयार करण्यात आलेल्या ऍग्रीमेंटवर स्वाक्षऱया करण्यास सांगत आहे.
कामगारांच्या इंजिनिरिंग वर्क्स असोसिएशनच्या माध्यमातून व्यवस्थापनापर्यंत ही बाब नेण्यात आल्यानंतर कंपनी व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम होते. परिणामी कामगारांनी शुक्रवारपासून संप घोषित केल्याने उत्पादन ठप्प झाले. कंपनीने उत्पादन सुरू ठेवण्याबाबत आणि शांतता व सर्वसामान्य स्थिती अबाधित ठेवण्याबाबत हमीपत्र दिल्याशिवाय कोणत्याही कामगाराला कंपनीत प्रवेश दिला जाणार नसल्याची नोटीस गेटवर लावली आहे. त्यामुळे कामगार दररोज कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन परत जात आहेत. आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह स्थानिक राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी भेटी देऊन कामगार व व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, संप सुरू असतानाच व्यवस्थापनाने चार कामगारांना निलंबनाची नोटीस बजावली असल्याने कामगारांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातच निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात चर्चेच्या बैठका होत आहेत. लवकरच यातून समाधानकारक मार्ग निघेल, असा आशावाद कामगार व्यक्त करीत आहेत. दरम्यान, सुरू असलेला संप आणि कामगारांचे निलंबन या बाबत कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता व्यवस्थापनाकडून बोलण्यास नकार देण्यात आला.