प्रतिनिधी/ रत्नागिरी
जैतापुर अणुउर्जा प्रकल्प नजीकच्या काळात सुरु करण्यासाठी मनुष्य बळ प्रशिक्षणाची योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी व्हिजेटीआय या तंत्र प्रशिक्षण संस्थेशी ईडीएफ या फ्रान्सच्या कंपनीचा सांमजस्य करार झाला आहे. येत्या वर्षभरात व्यवहार्यतापूर्व अहवाल तयार करण्यात येईल. आयटीआयपासून पीएचडीपर्यंत विविध शिक्षणक्रम पूर्ण झालेले तरुण जैतापूर प्रकल्पासाठी आवश्यक आहेत. कुशल मनुष्यबळ प्रकल्प सुरु होताना उपलब्ध असावे म्हणून ही योजना हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेचे अधिष्ठाता डॉ. फारुक काझी यांनी दिली.
जैतापुर अणुउर्जा प्रकल्प सुरु करण्याच्या उद्देशासाठी सुमारे 1000 एकर जमीन संपादित करण्यात आली. फ्रान्स बरोबरची चर्चा लांबल्याने हा प्रकल्प खोळंबला. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशाची व जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यातुन मार्ग काढण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. दृष्टीपथात असलेल्या जैतापुर प्रकल्पाला पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून आता प्रकल्प संस्था व तांत्रिक संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. पुढच्या काही वर्षात तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल तोपर्यंत प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष मार्गी लागेल असे तज्ञ म्हणत आहेत.
महाराष्ट्रात सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहार्यतापूर्व अभ्यासासाठी ईडीएफ, आय2ईएन आणि व्हीजेटीआय या संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थात्मक, औद्योगिक व शिक्षण, संशोधनात्मक पातळीवरील नागरी अणु क्षेत्रातील भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचे बळकटीकरण करणे, औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा विस्तार, सुरक्षिततेबाबतच्या अत्युच्च मानकांचे अवलंबन आणि अतिप्रगत प्रशिक्षण दृष्टिकोन यांना चालना देणे हे या तीन संस्थांचे उद्दिष्ट आहे.
जैतापूर प्रकल्प हा भारत व फ्रान्स यांच्या भागिदारीसाठी धोरणात्मक प्रकल्प असून 2 ईपीआर युनिट्सच्या बांधकाम कालावधीत भारतात 25 हजार थेट रोजगारांसह अतिउच्च कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. 2035 सालापर्यंत प्रतिवर्षी 75 टेरावॉट प्रति तासापर्यंत कार्बनमुक्त वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 7 कोटी घरांना पुरेल इतकी वीज पुरवली जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात यापूर्वी नमूद करण्यात आले होते.
अधिष्ठाता डॉ. फारुक काझी म्हणाले की, इडीएफ कंपनी फ्रान्समध्ये अनेक ऊर्जा प्रकल्प चालवते. तेथे मनुष्यबळ विकसित करण्याची कोणती कार्यपध्दती आहे याची माहिती दिली जाणार आहे. भारतातील परिस्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळ विकासाचा कार्यक्रम आखण्यात येईल. विविध क्षेत्रातील आयटीआयपासून, डिप्लोमा, डिग्री अभियंते तयार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. सध्या भारतात अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळ विकासाचे केवळ एकमेव केंद्र भाभा अणुऊर्जा संशोधन संस्थेत आहे. जगातील सर्वात मोठा ठरू शकेल असा जैतापूर प्रकल्प उभारण्यासाठी मनुष्यबळ लागेल. हे मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. बीटेक, एमटेक एवढेच काय अणुऊर्जा उत्पादनासाठी पीएचडीपर्यंत प्रशिक्षण देण्यासाठी व्यवहार्यतापूर्व अभ्यास करुन एक अहवाल तयार करण्याचे काम व्हीजेटीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्यावर कार्यवाही सुरु झाली आहे.
एका वर्षात व्यवहार्यतापूर्व अहवाल
जैतापूर प्रकल्पासाठी मनुष्यबळ विकसनासाठी व्यवहार्यतापूर्व अभ्यास व्हीजेटीआयकडून हाती घेण्यात येईल. हे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
डॉ. फारुक काझी,
अधिष्ठाता संशोधन आणि विकास
व्हीजेटीआय मुंबई