वार्ताहर / राजापूर
केंद्र सरकारने 10 स्वदेशी 700 मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिली आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील बहुचर्चित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ रखडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला वेग मिळणार आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एकूण 8 गिगावॅटच्या 10 अणुभट्टय़ांवर काम चालू आहे. केंद्र सरकारने 10 स्वदेशी 700 मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्सच्या बांधकामासाठी एकूण 7 गिगावॅटच्या फ्लीट मोडमध्ये उभारण्यासाठी आर्थिक मंजुरी दिली आहे. अणुऊर्जा व अवकाश प्रभारी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतात 6 हजार 780 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या 22 व्यावसायिक अणुऊर्जा अणुभट्टय़ा न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे चालवल्या जातात.
भारत सरकारने यापैकी रत्नागिरी जिह्यातील जैतापूर, कोवाडा (आंध्रप्रदेश), छाया मिठी विर्डी (गुजरात), हरिपूर (पश्चिम बंगाल) आणि भीमपूर (मध्यप्रदेश) मध्ये एकूण 25 हजार 248 मेगावॅट अणुऊर्जा क्षमता स्थापित करण्यास मान्यता दिली आहे. 2008च्या नागरी आण्विक करारामुळे भारताला आण्विक अलगावमधून बाहेर काढण्यात अमेरिकेचा पुढाकार होता. 2031 पर्यंत देशाची आण्विक क्षमता 22 हजार 480 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भविष्यात आणखी अणुऊर्जा प्रकल्पांचीही योजना असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील माडबन गावी होत असलेल्या 10 हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम जमीन अधिग्रहणानंतर कुर्मगतीने सुरू आहे. मागील काही वर्षात तर हे काम ठप्प झाले होते. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र शासनाने जैतापूर प्रकल्पातील रिऍक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.