प्रतिनिधी / बेळगाव
समस्त जैन समाजातर्फे रुपाली कन्व्हेंशन सेंटर येथे सुरू असलेल्या सम्यक ज्ञान शिबिराची सांगता बुधवारी झाली. गेले दहा दिवस आयोजित या शिबिरात मुनिवर्य वृषभ सागर, संयम सागर, नियम सागर व अभिनंदन सागर यांनी जैन धर्माचे तत्त्वज्ञान या विषयावर शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले.
रुपाली कन्व्हेंशन सेंटर येथील या शिबिराला 1 हजारहून अधिक शिबिरार्थी उपस्थित होते. बुधवारी सांगता समारंभाप्रसंगी बोलताना आचार्य नियम सागर मुनी यांनी अहिंसेने चालतो तो खरा मनुष्य होय. कोणत्याही जातीय विद्वेषाला थारा देऊ नका, क्रोध, मोह, माया, लोभ कमी करून त्यांना नेहमी नियंत्रणात ठेवा. अपेक्षा सोडा ज्ञान मिळवा असे सांगून प्रत्येक जीव सन्मार्गाने मोक्षाला जाऊ शकतो, असा उपदेश केला.
मुनी वृषभ सागर, संयम सागर आणि अभिनंदन सागर यांनी सुद्धा आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याच कार्यक्रमात महावीर जैन कल्याण अध्यक्ष राजू दोड्डण्णावर यांच्या सहकार्याबद्दल प्रसन्न पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसन्न पाटील यांच्या पत्नी नंदा, मुलगा इंद्रजित आणि सून प्रियांका या सर्वांनी मुनींच्यासमोर मिथ्या व्रताचे आचरण करण्याचा निश्चय केला. नियम सागर महाराजांनी चातुर्मास बेळगावमध्येच करावा, अशी अपेक्षा राजू दोड्डण्णावर यांनी व्यक्त केली. शिबिरार्थीपैकी अनेकांनी या शिबिरामुळे जैन धर्माचे नेमके तत्त्वज्ञान समजण्यास मदत झाली, असे सांगितले. सूत्रसंचालन सुमन पत्रावळी यांनी केले.