प्रतिनिधी /बेळगाव
जैविक संवर्धनासाठी शासनाने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, दि. 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत बेळगाव महापालिकेच्यावतीने तलावांचे पुनरूज्जीवन आणि वृक्षारोपण करून जैविक संवर्धनासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
जैविक संवर्धन समितीची बैठक मंगळवारी महापालिका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जैविक संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाकडून सतरा उपक्रमांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी शक्मय असेल तो उपक्रम राबवून जैविक संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे.
औषधी रोपांची लागवड, वृक्ष लागवड, तलावांचे संवर्धन, जैविक संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱया संघटनांचा सन्मान अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील तलावांचे संवर्धन आणि महापालिकेच्या खुल्या जागांवर वृक्षारोपण करून जैविक संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, वन रक्षणाधिकारी शिवानंद मगदूम, ग्रीन स्वसाहाय्य संघटनेच्या रूपा घाडी, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर, मनपा पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किलारी, बागायत खात्याचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.