खेट्यामुळे रविवारी गर्दीत भर; ई-पाससह इतर निर्बंधांमुळे वादावादीचे प्रकार
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना संसर्ग कमी झाल्याने कोल्हापूर जिल्हा निर्बंधमुक्त झाला आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तरीही जोतिबा डोंगर येथे मंदीरात दर्शनासाठी भाविकांना अक्षरशः यातनाच सोसाव्या लागत आहेत. आता जोतिबाचे खेटे सुरु झाले असून रविवारी गर्दीत भर पडत आहे. तसेच उन्हाचा तडाखाही वाढत चालला आहे. अशा स्थितीतही मंदीरातील ई-पाससह इतर निर्बंध न उठविल्याने तसेच दर्शन रांगेच्या नियोजनाअभावी भाविकांची गैरसोय होत आहे. निर्बंध उठले तर मग चार ही दरवाजे का खुले होत नाहीत, अशी विचारणा भाविकांसह पुजारी वर्गामधूनही होत आहे.
जोतिबा डोंगर हे महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दीही असतेच. परंतु गेल्या दोन वर्षात कोरानाच्या संसर्गामुळे याला मर्यादा आल्या आहेत. अलिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोल्हापूर जिल्हा निर्बंधमुक्त झाला आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु जोतिबा डोंगर येथे अद्याप पूर्णपणे निर्बंध उठविले नसल्याचे चित्र आहे.
जोतिबा दर्शनासाठी भाविकांना ई-पासद्वारे सोमवार ते शनिवार पश्चिम दरवाजातून मंदीरात प्रवेश दिला जात आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर उत्तर दरवाजा व दक्षिण दरवाज्यातून बाहेर सोडले जात आहे. आता निर्बंध उठले तरी ई-पास सुविधा बंद केल्याने रांगेत तासन तास भाविकांना ताटकळत उभा रहावे लागत आहे. त्यामुळे भाविक व देवस्थान समितीचे कर्मचारी तसेच पोलीसांबरोबर वादावादीचे प्रकार होत आहेत. तसेच येथील हक्कदार पुजार्यांचीही ई-पास बंद करुन चार दरवाजे खुले करण्याची मागणी आहे. यावरुन त्यांचीही देवस्थान समिती प्रशासनाबरोबर शाब्दिक चकमक होत आहे.
आता रविवारी जोतिबाचे खेटे सुरु झाले आहेत. त्यामुळे रविवारी ई-पास बंद करुन हा दरवाजाही बंद करण्यात आला आहे. या दिवशी फक्त उत्तर दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खेट्य़ांमुळे गर्दीचे प्रमाण वाढले असल्याने एकाच दरवाजातून दर्शनासाठी प्रवेशाने ताण पडत आहे. दर्शनासाठी केलेल्या रांगांचे अवघड नियोजनामुळे गर्दीत भर पडत आहे. दक्षिण दरवाजाजवळ आलेल्या भाविकाला तेथील दुकानाजवळ पादत्राणे काढून दूर अंतरावर चालत जाऊन उत्तर दरवाजाच्या रांगेत उभा रहावे लागत आहे. यामुळे जवळपास सर्व गावालाच वेढा मारला जात आहे. यामुळे भाविकांना रणरणत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच दर्शनासाठी यातना सोसाव्या लागत आहेत. आता निर्बंध उठले मग चार दरवाजे खुले का होत नाहीत? अशी विचारणा भाविकांसह पुजारी वर्गाकडून होत आहे.