अमरसिंह पाटील/कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान, कुलदैवत जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच मांदियाळी असते. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील भाविकांनी हा परिसर फुलून गेलेला असतो. रविवारचे खेटे, पौर्णिमा, चैत्र यात्रा, षष्ठी यात्रेसह पाकाळणीच्या सोहळ्यामध्ये जोतिबा मंदिर परिसरात भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. मात्र आता यापुढे मंदिर परिसरात प्रसाद वाटप करता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात मंदिराच्या सुरक्षेसह स्वच्छतेच्या दृष्टीने मंदिर परिसरात प्रसाद बनवण्यास आणि वाटप करण्यास मनाई केली आहे. मंदिर परिसर वगळता बाहेरील आवारात प्रसाद बनवून त्याचे वाटप करावे, असा ठराव समितीने केला आहे.
जिह्यासह परराज्यातील अनेक सामाजिक सेवा संस्थाकडून भाविकांना प्रसाद वाटप केला जातो. विशेषतः खेटे, षष्ठी यात्रा, पौर्णिमा, चैत्र यात्रा या कालावधीत प्रसादाचे वाटप केले जाते. हा प्रसाद मंदिराच्या पूर्व बाजूच्या आवारात बनवला जातो आणि तेथेच वाटप केला जातो. मात्र त्यामुळे परिसर अस्वच्छ होत होता. दर्शनासाठी येणाऱया भाविकांचाही गैरसोय होत होती. दरम्यान प्रसाद बनवण्यासाठी सामाजिक सेवा संस्थाकडून गॅस सिलिंडर, मोठय़ा चुली मांडल्या जात आहेत. यामध्ये लाकडाचा वापर केला जातो. सिलिंडर स्फोटाच्या जिह्यातील घटना पाहता मंदिर परिसरात गॅस सिलिंडरद्वारे प्रसाद बनवणे जोखमीचे आहे. मंदिर परिसरात प्रसाद वाटताना द्रोण पत्रावळीमुळे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छताही होते. या सर्वांचा विचार करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत मंदिर परिसरात प्रसाद बनवणे तसेच वाटप करण्यास मनाई घातली आहे.