मुंबई/प्रतिनिधी
दादरा नगर हवेलीत (dadra and nagar haveli) होणाऱ्या पोटनिवडणुकीत (ByPoll) आता शिवसेनाही (Shivsena) उतरली आहे. मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त होती. यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सिल्वासाच्या इतिहासात सर्वात मोठा विजय होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला आगामी लोकसभा निवडणूकीत सहानभूतीची गरज नसल्याचेही ते म्हणाले. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठे मंत्री आता दादरा नगर हवेलीत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या हजेरीवरूनही संजय राऊतांनी (sanjay raut) फिरकी घेतली. जो बायडन जरी आणले, तरी आम्ही घाबरत नाही, असे वक्तव्य राऊतांनी केलंय.
गेल्या चार दिवसांपासून रेल्वेमंत्री (railway minister) सिल्वासामध्ये (Silvassa) येऊन बसले आहेत. रेल्वे मंत्रालयाला काहीच काम नाही का ? की एअर इंडियासारखा लिलाव करून टाकला आहे का? असा सवाल त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातले संपुर्ण मंत्रीमंडळ विधानसभा निवडणूकीसाठी उतरले होते. पण ममता बॅनर्जींसमोर भाजपचे काहीच चालले नाही. त्याच पद्धतीने सिल्वासामध्ये भाजपचे काहीही चालणार नाही. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला सहानभूतीची गरज नाही, असेही ते म्हणाले. मोहन डेलकर यांनी कायम संघर्ष केला. शिवसेनेने डेलकर कुटुंबीयांचा न्याय मिळवून देण्यासाठी हात पकडला आहे, शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत सोबत लढणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.