अध्याय तेविसावा
भगवंत म्हणाले, माणसाचं मन तसं बघायला गेलं तर निर्जीव असतं पण जीवात्मा स्वतःच्या चैतन्याने त्याला क्रियाशील करतो. क्रियाशील मन जिवात्म्याला भुरळ घालते आणि स्वतःच्या तालावर नाचवू लागते.
ज्याप्रमाणे भस्मासुराने त्याला वर देणाऱया महादेवाच्या डोक्मयावरच हात ठेवून महादेवालाच भस्म करायचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे माणसाचे मन त्याला चैतन्याचा पुरवठा करणाऱया जिवात्म्यालाच गुलामी पत्करायला लावून त्यावर हुकूमत गाजवत असते. त्यामुळे जीवात्मा सुखदुःख भोगत असतो म्हणून जिवात्म्याला सुखदुःखापासून व जन्ममरणापासून वाचवण्यासाठी मनालाच निग्रह करायला लावणे हाच उपाय उरतो. मनाचा निग्रह करण्यासाठी दान, स्वधर्माचे पालन, यमनियम, वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. अर्थातच आपण या गोष्टी करत असताना आपण या गोष्टी मनोनिग्रह साधण्यासाठी करत आहोत याचे सतत भान ठेवावे लागते.
अन्यथा स्वतःचा नावलौकिक वाढवण्यासाठी केलेल्या वरील गोष्टी कितीही कसोशीने केल्या तरी त्या वाया जातात. मनाचे नियमन करण्याची बुद्धी नसेल तर यम-नियम हीसुद्धा एक उपाधीच आहे. उपाधी नेहमीच देहबुद्धीला खतपाणी घालत असते त्यामुळे, ‘खरोखर साधक काय तो मीच’ हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो. साधक ज्ञानसंपन्न असला, तर तो फळाची आशा निखालस सोडून देऊन दानादिक स्वधर्माचरण करील आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होईल. परंतु ‘माझी चित्तशुद्धी व्हावी’ अशी बुद्धी उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे. तरच साधने सिद्धीला जातात. सर्व साधनात माझी भक्ती हीच मुख्य होय. त्यातही नामाची कीर्ती विशेष आहे. नामाने चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूपस्थिती प्राप्त होते. स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चळ झाले की, साधन निघून जाते.
ज्याचे मन कोणतेच नियमन पाळत नाही, जे मन सदोदित विचारशून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार आसक्त असते, त्याच्यासाठी साधने निरुपयोगी होतात. मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात. इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हे बलवानांपेक्षाही बलवान आहे. जो मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. मनाने सर्वांना आपल्या आधीन केलेले आहे परंतु मन मात्र कोणालाच आवरत नाही. मनाने देवांनाही छळले आहे, ते इंद्रियांना कसे आवरणार? मनाचे नियमन करणारा चंद्र आहे पण मनाने त्या चंद्राला छळले. त्या चंद्राला मनानेच गुरुपत्नीशी व्यभिचार करावयास लावून त्याला क्षयरोगी बनविले. ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे. पण त्या ब्रह्मदेवाची बुद्धीही मनानेच भ्रष्ट केली, म्हणून त्याची कन्या त्याचे निवारण करीत असताही ब्रह्मदेवाने त्या आपल्या कन्येचा अभिलाष केलाच. चित्तामध्ये वासुदेवाचे अधि÷ान आहे पण त्या वासुदेवालाही मनाने हळूच फसविले. त्याला वृंदेचे ध्यान लावून स्मशानात पाडले. रुद्र उर्फ महादेव हा अहंकाराचा नियामक आहे पण त्यालासुद्धा मनाने फसवले. त्याने ऋषिपत्नीचा अभिलाष केला असता त्या महषीने शाप देऊन त्याचा लिंगपात केला! असे देवांनासुद्धा जिंकण्याला कठीण जे मन, त्याला इतर कोण आवरणार? आता तू म्हणशील की, इंद्रिये मनाचे नियमन करतील. पण ती इंद्रियेच मुळी मनाच्या आधीन असतात. जेंव्हा इंद्रिये स्वाधीन ठेवून मनच एखाद्या विषयात एकाग्र होते, तेव्हा त्या ठिकाणी इतर इंद्रियांचे सामर्थ्य खरोखर निष्फळ होऊन राहते. इंद्रिये आणि विषय ह्यांचे ऐक्मय झाले आणि त्यावेळी जर मनाची वृत्ती बदलली, तर ते विषय भोगावयास मिळत नाहीत. कारण इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच स्फुरत नाही. मनाचे धर्मच जेव्हा आसक्तिरहित होऊन जातात, तेव्हा इंद्रियांच्या इच्छेचे काहीच चालत नाही कारण इंद्रियांचा सर्व समुदाय मनाच्या स्वाधीन असतो म्हणून इंद्रियांकडून मनाचे नियमन कधीही घडत नाही.
क्रमशः