अयोध्येनंतर आता काशीचा मुद्दा चर्चेत
वृत्तसंस्था/ वाराणसी
अयोध्येतील भूमी वाद संपुष्टात आल्यावर आता वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीसंबंधी खटला सुरू झाला आहे. मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करविण्याच्या अर्जाच्या विरोधात दाखल आक्षेपांवर सुनावणीनंतर न्यायाधीशांनी मंगळवारी निर्णय राखून ठेवला आहे.
भगवान विश्वेश्वराच्या वतीने पंडित सोमनाथ व्यास आणि अन्य व्यक्तींकडून दाखल याचिकेवर 22 वर्षांनी न्यायाधीश आशुतोष तिवारी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. खटल्यात नियुक्त न्यायलयमित्र विजय शंकर रस्तोगी यांच्याकडून मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याच्या दाखल अर्जावर अंजुमन इंतजामिया मसाजिद आणि सुन्नी वक्फ मंडळाने (लखनौ) आक्षेप घेतला आहे.
आक्षेपांवर मंगळवारी सुनावणी झाल्यावर अंजुमन इंतजामियाचे वकील एखलाक अहमद आणि वक्फ मंडळाचे वकील तौहीद खां यांनी प्रकरणाशी संबंधित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आणि स्थगिती असल्याची माहिती दिली आहे. या स्थितीत दिवाणी न्यायाधीशाला सुनावणीचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
रस्तोगी यांनी उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश संपुष्टात येताच सुनावणी सुरू झाल्याचे म्हटले आहे. ज्ञानवापी ज्योतिर्लिंग विश्वेश्वर मंदिराचा हिस्सा आहे. तेथे हिंदू भाविकांना पूजा, दर्शनासह निर्मिती, दुरुस्ती आणि पुनरुद्धाराचा अधिकार प्राप्त असल्याचा दावा मंदिराच्या वतीने करण्यात आला आहे.