आर्ष विद्या केंद्राचे स्वामी चित्प्रकाशानंद सरस्वती यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
ज्ञान व अहंकार बरोबर जात नाहीत. ज्ञान अव्दैत हवे व आचरण शास्त्रानुसार हवे. त्यासाठी धर्मशास्त्र मार्गदर्शक ठरते. ज्याचे जीवन केवळ ज्ञानाने परिपूर्ण व अहंकार विरहित आहे. ती ज्ञानी व्यक्ती देवांसाठी सुध्दा वंदनीय ठरते. आपले आचरण तसेच ठेवा व आत्मानंदाची अनुभूती घ्या असा उपदेश आर्ष विद्या केंद्राचे स्वामी चित्प्रकाशानंद सरस्वती यांनी केला.
हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत मनीषा पंचकम् या विषयावर त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, शास्त्राचे अध्ययन करुन जो ज्ञानी होतो तो ब्राम्हण होय. पृथ्वीवर जन्म घेणाऱया प्रत्येक व्यक्तीला ब्राम्हणत्व प्राप्त होणे हा पुरुषार्थ आहे. आपण जन्म घेतो पण त्याचा उद्देश आपल्याला माहित नाही. जगण्याचा पूर्ण आनंद हवा तर सद्गुरूला शरण जाणे अपरिहार्य आहे. कारण त्याविना मोक्ष हे कल्पांतातील आहे.
सत्य, ज्ञानंम, आनंदम् हे ब्रम्हतत्व (परमेश्वर) आहे. सत्य कधीही बदलत नाही. ज्ञान म्हणजे प्रकाश जाणिव करुन घेणे, आकलन करुन घेणे. त्यामुळे आकार किंवा गुण महत्वाचे नाहीत तर स्वरुप महत्वाचे आहे. आकार व गुण बदलतात. पण स्वरुप बदलत नाही. म्हणजेच मी सतचित्त स्वरुप ब्राम्हण आहे, अर्थात प्रत्येक जीव साक्षात ब्रम्हच आहे. जीवनात पालक व गुरूंना यासाठी महत्व आहे की, ते आपली अविद्या अज्ञान घालवतात व हे जग ब्रम्हस्वरुप जाणण्यासाठी अविद्येचा नाश महत्वाचा ठरतो, असे स्वामी म्हणाले.
जोवर अज्ञान, अविद्या आहे तोवर कल्पना विस्तारच होत रहातो. अविद्या दृष्टिवर झापड आणते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या स्वरुपाचाच विसर पडतो. या कींकर्तव्यमूड अवस्थेतून आपल्याला सद्गुरू जागे करतो. दुःखाला निमित्त लागते, सुखाला नाही. जन्मतःच सर्व विकार आपल्या सोबत असतात. सर्व काही नाशवंत आहे, याचे आकलन ज्याला गुरूच्या सहाय्याने होते तो सद्गुरूस्वरुप असतो. दुर्गणरहित ज्याचे अंतःकरण आहे त्या व्यक्तीव्दारेच हे तत्व जाणले जाते, असे स्वामींनी नमूद केले.
मन, बुध्दी, चित्त, अहंकार, किंवा पंचेंद्रिय सुध्दा मी नाही हा देह माझा नाही, शिल्लक आहे ते प्रारब्ध कर्म ज्याचा सहज स्वीकार आपल्याला करता यायला हवा. सर्व अवस्थेमध्ये ‘मी’ आहे याचे भान असतेच. परमेश्वर आपल्यापासून दूर आहे हा केवळ भास आहे. वास्तव सदैव आमच्या अंतःकरणात आहे. आत्मास्वरुप आमचे ज्ञान, अज्ञानाने नाश होत नाही, असे ते म्हणाले.
ईश्वर जसा सर्वव्यापी तसा तो देहस्थ ‘मी’ला व्यापून आहे. त्यामुळे जीव व जगत् भिन्न नाही. आनंद हा आपलेच स्वरुप आहे, त्यासाठी माध्यम वेगळे असू शकते. त्यामुळे ब्रम्हानंद हाच सर्वांचा आनंद आहे हे तत्व कळाले तर आपण नित्य आनंदात राहू शकतो, असे सांगून स्वामींनी समारोप केला.
वसंत व्याख्यानमालेत आज अनिल आजगावकरांचे व्याख्यान
हेरवाडकर शाळेच्या सभागृहात सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेंतर्गत मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी 5.30 वा. अनिल आजगावकर यांचे व्याख्यान होणार आहे. ‘स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीचा वैचारिक प्रवास’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
परिचय पुढीलप्रमाणे- अनिल आजगावकर एम. ए. पदवीधर असून, स्तंभलेखक म्हणून परिचित आहेत. सध्या तरुण भारतमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींवर स्तंभलेखन सुरू आहे. त्याशिवाय साप्ताहिक साम्यवादी व युगांतरमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मजदूर को-ऑप. सोसायटीचे संचालक आहेत. कॉमेड कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ समितीचे सदस्य आहेत. लोकमान्य ग्रंथालयाच्या बुक लव्हर्स क्लबचे सदस्य आहेत. अनेक राजकीय, सामाजिक, महिला व कामगारविषयक विषयांवर लेखन करतात. कोविड नियमांचे पालन करून रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.