पदवीवर आक्षेप घेणाऱयांना मंत्री उदय सामंतांचे उत्तर
प्रतिनिधी/ चिपळूण
विनोद तावडेंच्या पदवीबाबत ज्यांनी शंका घेतली त्यांनीच आपल्याबाबतही शंका घेतली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद स्विकारल्यानंतर चोवीस तासांत पदवीचा मुद्दा उपस्थित करून ज्यांनी आपल्याला प्रकाशझोतात आणले त्या सर्वांना आपण धन्यवाद देतो. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेऊन आपण कुठलेही पाप केलेले नाही असे सांगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पदवीबाबत शंका घेणाऱयांना चोख प्रत्युत्तर दिले.
सामंत यांनी पुणे येथील ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. हे विद्यापीठ कुठलीही सरकारी मान्यता नसलेले बोगस विद्यापीठ असल्याने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर रविवारी सामंत यांच्या पदवीवर शंका उपस्थित केली गेली. काही वृत्तवाहीन्यांनी याबाबत बातम्या दिल्या आहेत.
यासंदर्भात सोमवारी चिपळूण दौऱयावर आलेल्या सामंत यांना पत्रकारांनी छेडले. माझ्या पदवीवर शंका घेतली गेली याबद्दल आपल्याला कसलाही कमीपणा वाटत नाही. 1991 मध्ये उद्योजक बनण्यासाठी प्रॅक्टीकल नॉलेज मिळण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर विद्यापिठामध्ये प्रवेश घेतला होता. तेथे प्रवेश घेऊन आपण काहीही पाप केलेले नाही. विद्यापिठाचे सर्टीफिकेट घेऊन शासकीय नोकरीचा लाभा घेतलेला नाही, की अन्य शासकीय फायदेही मिळवलेले नाहीत. त्यामुळे आपली बदनामी करून एखाद्याला गोळी न घेता झोप लागत असेल तर त्याला शुभेच्छाच आहेत, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.